ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. राज्यात रविवारी 29,177 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर नव्या 26, 672 रुग्णांचे निदान झाले आहे. तर कालच्या दिवशी 594 जणांचा मृत्यू झाला. सद्य स्थितीत राज्यातील मृत्यू दर 1.59 टक्के एवढा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 51 लाख 40 हजार 272 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.12 % इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 30 लाख 13 हजार 516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 26 लाख 96 हजार 306 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 331 दिवसांवर
मुंबईत मागील 24 तासात 1,470 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 1,431 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आता पर्यंत 6,52,686 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 28,410 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.