वेळवंड भायजेवाडीतील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सडय़ावर रजनी रविंद्र भायजे (56) rयांचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा घातपात असल्याचे पुढे आले असून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना उघड झाली. मिळालेल्या माहितीनुसार वेळवंड भायजेवाडीतील रजनी भायजे गुरूवारी 2 एप्रिलच्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. तिचा दीर सुभाष लक्ष्मण भायजे यांनी नातेवाईकांकडेही चौकशी केली. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी रजनी यांचा मुलगा रविराज याला भायजेवाडीतील तीन आंबा येथील शेतजमिनीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह दिसून आला. मृतदेहाचा कमरेपासून डोक्याकडील भाग ओळखण्याजोगा तर उर्वरित भाग पूर्णतः जळालेल्या अवस्थेत होता.
या प्रकाराने रविराजसह भायजे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी याबाबतची कल्पना गावच्या सरपंचांना दिली. तीन आंबा परिसरात आढळलेला मृतदेह रजनी यांचाच असल्याची खात्री कुटुंबियांकडून झाली. ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश कदम आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी पोहचले. रजनी भायजे यांचा मृतदेह जाळण्यासाठी भाताच्या पेंढय़ाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याठिकाणी रॉकेलचा कॅन व एक बॅटरी देखील पोलिसांना आढळून आली.
घटनास्थळावरील स्थितीवरून रजनी भायजे यांना आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो घातपातच असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या महिलेला ठार मारून नंतर जाळण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळवंडचे सरपंच संतोष मारूती गुरव यांनी तक्रार दिली. त्यावरून शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञाताविरोधात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या खुनातील संशयितांना गजाआड करण्यात येईल असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.