एसीजीएलच्या कामगार संघटनेचा इशारा : मनसे कामगार संघटनेशी कायदेशीर सल्लागार करारावर सह्या ,नवनिर्वाचित चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
भुईपाल येथील एसीजीएल कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. गेल्या तीन वर्षापासून पगारवाढीचा करार प्रलंबित आहे. दुसऱया कराराची सुरुवात आणखी काही दिवसांनी होणार आहे. मात्र कंपनीचे व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या व्यवस्थापनातील काही वरि÷ अधिकारी मनमानीपणे काम करीत आहेत. गेल्या तीन वर्षापासून अनेक प्रकारचे अन्याय झेलले आता मात्र या संघर्षावर मात करण्याची क्षमता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. गणेशचतुर्थी पर्यंत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक निर्णय न झाल्यास गणेशचतुर्थीनंतर कंपनीच्या व्यवस्थापनाला पाच दिवस संपावर जाण्याची नोटीस देण्यात येणार आहे. यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा एसीजीएल कामगार संघटना व एसीजीएल बस बॉडी कामगार संघटनेने होंडा या ठिकाणी सुंदरम सभागृहात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यासभेला कामगारांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटना कंपनीच्या कामगार संघटनेला कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये या संदर्भाचा करार पूर्ण झालेला आहे. कायदेशीर सल्ल्यानुसारच एसीजीएल कंपनीचे कामगार व्यवस्थापनाच्या विरोधात व आपल्या न्यायिक मागण्या मान्य करण्यासाठी संघर्ष करणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सभासद गणेश खंडारे, कामगार संघटनेचे चिटणीस यशवंत हाडगे, चिटणीस दिनेश चव्हाण, कामगार संघटनेच्या कायदेशीर सल्लागार सुभाष नाईक, जॉर्ज कामगार संघटना शीट मेटल डिव्हिजन अध्यक्ष बाबलो सावंत, उपाध्यक्ष प्रशांत खानोलकर, सचिव सुभाष परब, सूर्यकांत गावस, एसीजीएल कंपनी बस बॉडी डिव्हिजन कामगार संघटनेचे अध्यक्ष गुणाजी परब, उपाध्यक्ष कालिदास नाईक, महेश दिवेकर, जयसिंग देसाई, हरिश्चंद्र नाईक, बाबुराव देरगुणकर, बाळकृष्ण साळगावकर, संतोष गाड, अर्जुन सावंत व इतरांची उपस्थिती होती.
कंपनीला गणेशचतुर्थी नंतर नोटीस बजावणार.
पत्रकारांना माहिती देताना राजेश उज्जैनकर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून कंपनीचे कामगार पगारवाढीसाठी व्यवस्थापनाकडे संघर्ष करीत आहे. कामगारांनी प्रतिमहिना 6850 रुपयांची पगारवाढीची मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. यामुळे गणेशचतुर्थीपर्यंत सादर करण्यात आलेल्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास चतुर्थीनंतर कंपनीला पाच दिवसांची संपाची नोटीस देण्यात येणार असल्याचे राजेश उज्जैनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत याची मध्यस्थी फेटाळून लावली.
दरम्यान कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यस्ती केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीने व्यवस्थापनाने दर महिन्याला पहिल्या तीन वर्षासाठी 3600 तर चार वर्षासाठी 4500 रुपयांची पगारवाढ देण्याची मान्यता दिली होती. मात्र याला आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कामगारांनी तीव्र विरोध केला व मुख्यमंत्र्यांची मध्यस्थीही फेटाळून लावली, अशी माहिती उज्जैनकर यांनी दिली.
मनसे आपल्या पद्धतीने पाठिंबा देणार
गेल्या 40 वर्षांपासून ही कंपनी पूर्णपणे नफ्यात चालू आहे मात्र कामगार बांधवांच्या पगारवाढ व इतर सुविधांकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवेदन निवेदन व दणादण पद्धतीने या कामगारांना मदत करणार असल्याचे राजेश उज्जैनकर यांनी सांगितले. गरज पडल्यास या कामगार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे गोव्यामध्ये येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
श्रीनिवास धेंपो यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे–मागणी.
या कंपनीला 40 वर्षाचा इतिहास आहे. या कंपनीने अनेक चढउतार पाहिले आहेत. यापूर्वीचे चेरमन शिवानंद साळगावकर यांनी या कंपनीचा व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळला. कामगारांच्या अनेक समस्यांकडे शिवानंद साळगावकर यांनी बारकाईने लक्ष दिले. यामुळे कंपनीची वाटचाल सुरळीत पद्धतीने सुरू होती. व्यवस्थापनातील काही वरि÷ अधिकाऱयांच्या मनमानीमुळे कंपनीच्या समोर आजही अनेक समस्या निर्माण झालेले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी जोरदार मागणी या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. शेवटी राष्ट्रगीताने वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली.