गोव्यातील आयसीएआर कृषी संस्थेतर्फे ड्रोन विकसित, राष्ट्रीय स्पर्धेत पाच लाखांचे पहिले बक्षीस
प्रतिनिधी / पणजी
माडावर न चढता आता नारळ पाडणे शक्य होणार आहे. त्यासाठी गोव्यातील आय. सी. ए. आर. कृषी संस्थेने खास ड्रोन विकसित केला असून त्याचे नामकरण फ्लाय कोकोबोट असे केले आहे. या यंत्राला राष्ट्रीय स्पर्धेत 5 लाख रुपयांचे पहिले इनाम मिळाले आहे.
रिमोट कंट्रोलवर चालणारा हा ड्रोन माडापेक्षा जास्त उंचीवर उडू शकतो. चुडतांच्या झावळीतून मार्ग काढून परिपक्व झालेले नारळ हेरून अथवा शहाळी हवी असल्यास शहाळी नेहाळून तोडू शकतो, तशी धारदार ब्लेड या ड्रोणाला लावलेली आहेत. मात्र रिमोट कंट्रोलवाल्याचे कसब पणाला लावणारा हा ड्रोण आहे.
आयसीएआर कृषी विभागातील प्रमुख वैज्ञानिक अदवीराव देसाई, गोवा विद्यापीठातील प्राध्यापक राजेंद्र गाड व त्यांचे विद्यार्थी अभिराज पेडणेकर यांच्या कल्पनेतून आणि मेहनतीतून हा ऑईल पाम हारवेस्टर फ्लाय कोकोबोट ड्रोन तयार झाला आहे. केंद्र सरकारने 2020 साली एक योजना जाहीर केली. त्यात कृषी विषयक उपकरणामध्ये सुधारणा घडवण्यास व नवनवीन शोध लावण्यास प्राधान्य देण्यात आले. या योजनेअंतर्गत स्पर्धा ठेवण्यात आली. कृतग्य ऍग्रोटेक हेकॉथॉन नामक या स्पर्धेत तांत्रिक विभागात गोव्याच्या वतीने सदर फ्लाय कोकोबोट ड्रोन स्पर्धेत उतरला आहे. या स्पर्धेत देशभरातून एकूण 784 पथके उतरली होती.
पोफळीवरील सुपारीही काढता येणार
दि. 31 मे 2021 रोजी या स्पर्धेचा निकाल झाला तेव्हा गोव्याच्या या फ्लाय कोकोबोट ड्रोन यंत्राला 5 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र मिळाले. यातून प्रेरणा घेऊन आता आयसीएआर कृषी केंद्राने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच ठरविले आहे. हा ड्रोन वापरल्यास एका तासाला 12 ते 15 माडांचे नारळ पाडले जाऊ शकतात. माडच नव्हे तर पोफळीवरील सुपारीही तोडली जाऊ शकते, असे गोवा विद्यापीठातील प्राध्यापक राजेंद्र गाड यांचे म्हणणे आहे.
दुसरे इनाम 3 लाख रुपयांचे असून भोपाळ येथील आईन्स्टीन वॉरियर गटाच्या बिक्रम ज्योती व जगजीत सिंग यांना प्राप्त झाले आहे. तर 1 लाखाचे तिसरे इनाम बेंगळूर येथील सेरीक्रॉप इनोव्हेटरच्या द्रोणाचारी मानवी व शुभाजीत सारखेल यांना प्राप्त झाले आहे.
सध्या या यंत्राचा वापर पाम तेलाची फळे तोडण्यासाठी केला जात आहे. भविष्यकाळात त्याचा विविध प्रकारे उपयोग होऊ शकतो. तसेच माडीवर न चढता सुपारी काढणे सोपे होणार आहे. अधिकतर भागातील पोफळीवर मिरवेल चढवून मिरीचे पिक घेतले जाते, त्यामुळे पाडेलींना पोफळीवर चढणे शक्य होत नाही. पाडेली खाली न उतरता एका पोफळीवरून दुसऱया पोफळीवर जाण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात घालतो. हे यंत्र वापरल्यास मिरवेलची कोणतीही हानी होणार नाही. मिरीला ‘ब्लॅक गोल्ड’ असे संबोधले जात असून हे पिक घेतल्यास बागायतदारांना बराच फायदा होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
या यंत्रामुळे पाडेली मिळत नाहीत ही समस्या कायमची दूर होऊ शकते. नारळ पाडताना माडाखाली थांबण्याची आवश्यकता नाही. ड्रोनला कॅमेरे बसवलेले असतील. दूर एका ठिकाणी स्क्रीनवरून निरीक्षण करून नारळ पाडले जाऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.