राज्यपाल पिल्लई यांचे उद्गार : बाल कल्याण आश्रमाला भेट
प्रतिनिधी /फोंडा
मानवी सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. मातृछायेसारख्या संस्थांच्या कार्यातून त्याचा प्रत्यय येतो. गोव्यातील हे एक आदर्श उदाहरण असून राजभवनतर्फे येत्या दोन महिन्यात राज्यातील विविध संस्थांना भेटी देऊन त्यांचे कार्य व समस्या जाणून घेतल्या जातील, अशी घोषणा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केली. मातृछायेच्या तळावली येथील बालकल्याण आश्रमाला राज्यपाल पिल्लई यांनी काल सोमवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मातृछायेतील मुले, पदाधिकारी व हितचिंतकांशी संवाद साधताना राज्यपाल पिल्लई यांनी यापूर्वी मिझोराम राज्यात राज्यपाल असताना आपले काही अनुभव सांगितले. कुठल्याही सामाजिक प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास त्यावर निश्चितच उत्तर सापडते. मिझोराममध्ये निर्माण झालेल्या सामाजिक पेचप्रसंगाची परिणती म्हणून येथील एका गटाने प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घातला होता. मात्र आपण मानवतेच्या पातळीवर हा प्रश्न हाताळल्याने त्यावर तोडगा काढणे शक्य झाले.
माजी दिवंगत राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दूल कलाम हे मानवतेचे श्रेष्ठ उदाहरण असल्याचे सांगून समाजातील सामान्यातील सामान्य घटकापर्यंत त्यांचा संपर्क असायचा. माणसांमध्ये कुठल्याही क्षणी सकारात्मक बदल घडू शकतो याचे योग्य उदाहरण म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन हे असल्याचे त्यांनी नमूद केले. बालवयात गणितात अगदी कच्चा असलेल्या आईन्स्टाईनमध्ये आयुष्याच्या एका वळणावर बदल घडून आला व जगातील ते एक विख्यात शास्त्रज्ञ बनले. स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण ही परिपूर्णतेकडे नेणारी प्रक्रीया असल्याचे सांगितले आहे. मुलांमध्ये बालवयात चांगले संस्कार घडविल्यास भविष्यात ते चांगले नागरीक बनतील असेही राज्यपाल पिल्लई यांनी पुढे बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपिठावर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटियाल, वाडी-तळावलीचे सरपंच दिलेश गावकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार राजेश साखळकर, मातृछायेचे पदाधिकारी प्रा. मधुकर दिक्षीत, कॅप्टन अनुप केणी, बालकल्याण आश्रमाचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागतपर भाषणात प्रा. दिक्षीत यांनी मातृछायेच्या कार्याची ओळख करुन दिली. आगामी काळात म्हापसा येथे नवीन आश्रमाचा संकल्प बोलून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चितळे यांनी तर डॉ. अनंत नाईक यांनी आभार मानले. मातृछायेच्या मुलांनी यावेळी मल्लखांबची साहसी प्रात्यक्षिके सादर केली.