प्रतिनिधी/ चिपळूण
गावात बांधलेल्या संरक्षण भिंतींबाबत मिरजोळी ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेला पत्रव्यवहार खोटा असल्याचे पुढे येत आहे. याबाबत सरपंचांना कोणतीही कल्पना नसून त्यांच्या सहीबाबतही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करून हे पत्र दिल्याचा आरोप होत आहे. माहितीच्या अधिकाराचा अर्ज गेल्याने हा प्रकार उघड झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. या कामांवर आक्षेप घेत येथील संतोष तांबे यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. याबाबतची कागदपत्रे त्यांनी बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितली आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभांमध्ये या भिंतीबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार कोणाकडेही केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी जानेवारी महिन्यात एका भिंतीची जागा बदलणे व कामाबाबतचे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. या पत्रावर केवळ सरपंच कनिज दलवाई यांची सही असून जावक क्रमांकही आहे. मात्र ग्रामसेवक सुभाष माळी यांची सही नाही.
हे पत्र मिळावे म्हणून तांबे यांनी दिलेल्या पत्रावर चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या एका बैठकीत चर्चा झाली. यावेळी दलवाई यांनी या पत्राबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, आपण सही केलेली नाही असे सांगितले. तसेच त्याची सत्यप्रत ग्रामपंचायतीकडे नसल्याचे ग्रामसेवक माळी यांनी सागितले. मात्र डाटा ऑपरेटर पवार यांनी हे पत्र माळी यांनीच आपल्याला टायपिंग करायला सांगितले होते व त्याची प्रत काढून झाल्यावर ती नष्ट करा असेही बजावले होते. मात्र कामामुळे ते मी नष्ट केले नाही असे स्पष्ट केले. माळी यांनीही या पत्राबाबत हात वर केले आहेत. त्यामुळे हा प्रताप कोणाचा याचा शोध घेतला जात असून ते निष्पन्न झाल्यावर संब्ंाधिताविरोधात खोटा दस्तऐवज तयार केला म्हणून पोलीस स्थानकासह अन्य विभागांकडे तक्रारी केल्या जाणार आहेत.