मुंबई/प्रतिनिधी
मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आता तीन प्रभाग पद्धत असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी हा मोठा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या याबाबत वेगवेगळ्या भूमिका होत्या. तसेच प्रभाग सदस्यांवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका होती तर शिवसेनेची चार सदस्य असावा अशी मागणी होती. पण अखेर तीन सदस्य प्रभाग पद्धतीला मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. या बैठकीत अजित पवार यांनी दोन सदस्यीय प्रभागांची भूमिका मांडली. तर एकनाथ शिंदे यांनी चार सदस्यीय भूमिका मंडली.