4 इंच पावसाची नोंद, घरांत पाणी शिरण्याच्या घटना, नद्यांना रौद्र रूप, दाभेल नदीलगतची भातशेती वाहून गेली
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील रस्ते जलमय होतानाच कित्येकांच्या घरांत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. दाभेल नदीला आलेल्या पुरामुळे दाभेल येथील धनगरवाडय़ांवरील घरांलगत पाणी घुसले, तर नदीच्या काठालगत अत्यंत कष्टाने केलेली भातशेती पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. या भातशेतीच्या जमिनीत पुराचे पाणी भरलेले आहे. दाभेलच्या धनगरवाडय़ावरील लोक भेंडी, काटेकणगा आणि अन्य फळ-भाज्यांची लागवड या ठिकाणी आतापर्यंत करत आलेले आहेत. पण सतत पडणाऱया पावसामुळे या पिकांवर परिणाम झाला असल्याची प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी प्रत्यक्ष या वाडय़ावर भेट दिली असता व्यक्त केली.
सतत पडत असलेल्या पावसामुळे किंदळे, मणगण येथील धनंजय पागी यांच्या घरात पाणी शिरले आणि त्यामुळे घरांतील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. या घटनेची खबर मिळताच त्वरित या ठिकाणी अग्निशामक दलाचे पथक आले. काणकोणच्या मामलेदार कार्यालयातील नियंत्रण कक्षातील कर्मचाऱयांनी या जागेची पाहणी केली. आगोंद, पाळोळे तसेच साळेरी या भागांत देखील काही किरकोळ घटना घडल्या आहेत. मात्र कोणत्याच ठिकाणी विपरित घटना घडल्याची नोंद आतापर्यंत झालेली नाही.
अर्धफोंड येथील तळपण नदीला पूर आलेला असताना भाटपाल येथील छोटय़ा पुलावरून पाणी जाऊन रस्ता वाहतुकीला काही क्षण धोकादायक बनला होता. पैंगीणच्या गालजीबाग नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली असून या नदीच्या काठाजवळ असलेल्या भातशेतीत पाणी तुडुंब भरल्यामुळे नदी आणि शेतजमीन एक झाल्याच्या अनुभव या भागातील लोकांनी घेतला. गालजीबाग समुद्राने देखील रौद्र रूप धारण केले असून नदीचे पात्र आणि समुद्र एकजीव झालेला आहे. मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी गालजीबाग किनाऱयावरील सुरूची झाडे उन्मळून पडली होती. त्याचा हा परिणाम असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सततच्या मुसळधार पावसामुळे काणकोण तालुक्यातील दूरध्वनी सेवा पूर्णपणे निकामी झाली असून इंटरनेट सेवा कोलमडली आहे. काणकोणात 23 रोजी 4 इंच इतक्या पावसाची नोंद झाली.