अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी तीन दरवाजे उघडले : नदीकिनाऱयावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा
प्रतिनिधी /कारवार
काळी नदीवरील कद्रा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कारवार, यल्लापूर आणि जोयडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कद्रा धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे बुधवारी दुपारी उघडण्यात आले आहेत. धरणातून विसर्ग होणाऱया पाण्याचा फटका कारवार तालुक्यातील काही खेडय़ांना बसण्याची शक्यता असल्याने काळी नदीच्या किनाऱयावर वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 2019 आणि 2020 अशा सलग दोन वर्षात काळी नदीवरील कद्रा धरणातील अतिरिक्त पाणी विसर्गाच्या चुकीच्या आणि अवैज्ञानिक नियोजनामुळे कारवार तालुक्यातील अनेक खेडी जलमय होऊन शेकडो कुटुंबीयांना फार मोठा फटका बसला होता.
जून महिन्यातही दरवाजे उघडले होते
कद्रा धरणातील कमाल पाण्याची पातळी 34.50 मीटर इतकी आहे. बुधवारी ही पातळी 31.88 मीटर इतकी झाली होती. धरणात 29,876 क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे. अतिरिक्त पाण्याचा धोका लक्षात घेऊन कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या वरिष्ठांनी धरणातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक दरवाजातून तीन हजार 350 क्युसेक्स इतके आणि एकूण 10,050 क्युसेक्स इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सुमारे 11,000 क्युसेक्स पाणी ऊर्जा निर्मितीनंतर नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. जून महिन्यातील पहिल्या पावसाच्या वेळीही कद्रा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते.
घाटमाथ्यावरील तालुक्यात अधिक पाऊस
दरम्यान, जिल्हय़ातील किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यांच्या तुलनेत घाटमाथ्यावरील शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर, जोयडा तालुक्यात अधिक पाऊस पडत आहे. परिणामी जिल्हय़ातील कोमनहळ्ळी जलाशयाचा अपवाद वगळता कोडसळ्ळी, गणेशगुढी, तट्टीहळ्ळा, लिंगनमक्की, गरिसप्पा या जलाशयातील पाण्याची पातळी आजअखेर गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक झाली आहे.