महागाईला लवकरच बसणार लगाम : पीक उत्पादनाचा दुसरा अग्रिम अंदाज जाहीर
शेतकऱयांचे कठोर परिश्रम, शास्त्रज्ञांचे कार्यक्षम संशोधन आणि सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे देश अन्नधान्य उत्पादनात सातत्याने नव-नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
– नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2021-22 साठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा अग्रिम अंदाज जाहीर केला आहे. पीक वर्ष 2021-22 मध्ये देशातील अन्नधान्य उत्पादन 1.71 टक्क्मयांनी वाढून 31.60 कोटी टन या नवीन विक्रमी उच्चांकावर जाण्याची अपेक्षा आहे. 2020-21 च्या उत्पादनापेक्षा हे प्रमाण 53.2 लाख टन अधिक आहे. 2021-22 या वर्षातील उत्पादन गेल्या पाच वर्षांतील (2016-17 ते 2020-21) अन्नधान्य उत्पादनापेक्षा सरासरी 2.53 कोटी टन जास्त आहे. या उत्पादन वाढीमुळे महागाईल लगाम बसण्याचे संकेत वर्तवले जात आहेत.
2021-22 या वर्षात तांदळाचे एकूण उत्पादन 12.79 कोटी टन इतके विक्रमी असण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 11.64 कोटी टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 1.15 दशलक्ष टन अधिक आहे. गव्हाचे एकूण उत्पादन 11.13 कोटी टन विक्रमी असल्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 10.39 कोटी टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 74.4 लाख टन अधिक आहे. पौष्टिक आणि भरड तृणधान्यांचे उत्पादन 4.98 कोटी टन असण्याचा अंदाज आहे, जे सरासरी उत्पादनापेक्षा 32.8 लाख टन अधिक आहे.
डाळी-तेलबिया कापसाचे उत्पादन वाढणार 2021-22 या वर्षात एकूण डाळींचे उत्पादन 2.69 कोटी टन असल्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या पाच वर्षांतील सरासरी 2.38 कोटी टन उत्पादनाच्या तुलनेत 31.4 लाख टनांनी जास्त आहे. तसेच तेलबियांचे उत्पादनही आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार ते अंदाजे 3.71 कोटी टन असणार असून ते 2020-21 या वर्षातील 3.59 कोटी टन उत्पादनापेक्षा 12 लाख टन अधिक आहे. याव्यतिरिक्त, 2021-22 या वर्षातील उत्पादन पाच वर्षांच्या सरासरी तेलबिया उत्पादनापेक्षा 44.6 लाख टन अधिक आहे. या कालावधीत देशातील ऊसाचे उत्पादन 41.40 कोटी टन होण्याचा अंदाज असून सरासरी 37.34 कोटी टन उत्पादनापेक्षा 4.06 कोटी टन अधिक आहे. तसेच कापसाचे उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे.