वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
यमनापूर गावाजवळून गेलेल्या सर्व्हिस रस्त्यावर त्वरित गतिरोधक बसवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. यमनापूर गावाजवळून गेलेल्या सदर सर्व्हिस रस्त्याच्या बाजूलाच यमनापूर गाव आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक व्यावसायिकांची वेगवेगळी दुकाने आहेत. यामुळे संपूर्ण दिवसभर या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते. संध्याकाळी सहानंतर तर खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झालेली असते. यावेळी रस्त्यावरून जाणारी दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांचीही वर्दळ फार असते. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनधारक बेफाम वाहने चालवत असतात. यामुळे अपघात होऊन एखाद्या निष्पापाचा जीव जाण्यास वेळ लागणार नाही. यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सार्वजनिक विहीर रस्त्यापलीकडे
यमनापूर गावच्या सर्व्हिस रस्त्याच्या पूर्वदिशेला सार्वजनिक विहीर आहे. विहिरीचे पाणीसुद्धा रस्ता ओलांडूनच आणावे लागते. तसेच जनावरांना चरावयाससुद्धा रस्ता ओलांडूनच न्यावे लागते. रस्त्यावर सतत सुरू असणारी वर्दळ, त्यातच गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने येत असल्यामुळे नागरिक व महिलांनाही जीव मुठीत धरून विहिरीचे पाणी आणावे लागते. तेव्हा यापुढे अपघाताची घटना घडून एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी सदर रस्त्यावर गतिरोधक घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.