- महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्णय
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 68 हजार पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर 503 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही आतापर्यंतची सर्वात जास्त रुग्ण वाढ आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला ‘उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे’ (Places of Sensitive Origin) म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणांहून प्रवास करणार्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे.
ज्या प्रदेशातून रेल्वे राज्यात प्रवेश करेल, त्या रेल्वेतील प्रवाशांची यादी ते कोणत्या स्थानकावर उतरणार याचा तपशील चार तास अगोदर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कळविणे बंधनकारक आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाश्यांना राज्यात प्रवेश करताना किंवा रेल्वे स्थानकांवर आल्यावर दाखवावा लागणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून एसओपी जारी करण्यात आल्या आहेत.