रत्नागिरी नगर परिषदेची अतिक्रमण हटाव धडक मोहीम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरात वाढलेल्या अनधिकृत टपऱया, बांधकामे व फुटपाथवरील विक्रेत्यांच्या गर्दीमुळे झालेल्या अतिक्रमणांवर नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला. या अतिक्रमणांवर मंगळवारी बुलडोझर फिरवण्याबरोबरच ती हटवण्याची जोरदार मोहीम राबवण्यात आली. कारवाईच्या भीतीने आदल्यादिवशीच अनेकांनी स्वतःहून टपऱया, खोके हटवले. मात्र ठाण मांडून राहिलेल्या टपऱया, खोके, फळविक्रेते, भाजीविक्रेते यांना हटवून झालेल्या साफसफाईमुळे रस्त्यांनाही मोकळे स्वरूप आले.
शहरातील रस्त्यांकडेला असलेल्या फुटपाथ व रस्त्यांत रहदारीस अडथळा होईल, अशाप्रकारे ही अतिक्रमणे फोफावली होती. ही गर्दी हटवण्यासाठी नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत निर्णय घेत खास मोहीम हाती घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळा होण्याकडे लक्ष वेधले होते. रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथूनच अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले होते. शहरातील प्रत्येक वॉर्डात अनधिकृत टपऱया व खोक्यांची संख्या वाढली होती. टपऱयांमुळे शहरातील रस्त्यांना बकालतेचे स्वरूप आले आहे.
रस्त्यावरील फुटपाथवर असणारी अतिक्रमणे, टपऱया हटवण्यासाठी नगर परिषद सज्ज झाली होती. या अनधिकृत खोके, टपऱया व अतिक्रमण करणाऱयांवर नगर परिषदेने मंगळवारी सकाळपासून कारवाईला प्रारंभ केला. नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई हाती घेण्यात आली. नगर परिषदेने अतिक्रमणे हटवण्याबाबत 2 दिवस लाऊडस्पीकर लावून रिक्षा फिरवल्याने अनेकांनी स्वत:हून अतिक्रमणे तात्पुरत्या स्वरूपात काढल्याचे दिसून आले. मारुती मंदिर येथून खोके हटवण्यास सुरुवात झाली. यासाठी जेसीबी, इतर गाडय़ांचा वापर करण्यात आला. अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहिल, असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेटय़े यांनी सांगितले.