हातीस येथे पुराच्या पाण्यात बस अडकली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसाने कोकणासह जिल्हय़ाला चांगलेच झोडपून काढले आहे. राजापुरात अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. वाशिष्ठी व शिवनदीची पाणीपातळी वाढल्याने चिपळूण नगरपरिषद प्रशासन अलर्ट झाले आहे. येथील शाळांनाही 9 जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे पुराच्या पाण्यात बस अडकून पडल्याची घटना घडल़ी लांजा, संगमेश्वरातही मुसळधार पावासाने दाणादाण उडवली. दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील अनेक नद्या इशारा पातळी ओलांडून तर काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने जनजीवन प्रभावीत झाले आहे. त्यात हवामान विभागाने 8 जुलैपर्यंत रत्नागिरीसह, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्हय़ांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण कोकण किनारपट्टी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या प्रभावाखाली आली आहे. त्यामुळे सर्वत्र पावसाचे धुमशान सुरू आहे. रविवारपासून सोसाटय़ाच्या वाऱयासह धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. अनेक मोठय़ा नद्यांच्या पाणीपातळीने मर्यादा रेषा ओलांडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरस्थितीत वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्हय़ात सोमवारी झालेल्या काही तालुक्यातील अतिमुसळधार पावसाने ही पूरस्थिती प्रकर्षाने दिसली. त्यात खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यांचा समावेश होता. जिल्हय़ात काही ठिकाणी या पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे दरडग्रस्त ठिकाणच्या रहिवासी नागरिकांना सतर्क राहून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतराच्या सूचना प्रशासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत.
32 प्रवाशांना सुखरूप काढले बाहेर
रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे पुराच्या पाण्यात बस अडकून पडल्याची घटना घडल़ी या बसमधील विद्यार्थ्यांसह 32 प्रवाशांना स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात आल़े पुराचे पाणी असतानाही अतिउत्साहाने बस पाण्यात घालणाऱया चालकावर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, असे एसटीचे वाहतूक नियंत्रक अनिल म्हेतर यांनी सांगितल़े
रत्नागिरी बसस्थानक येथून दुपारी 2 च्या सुमारास हातीस बस (एमएच 20 बीएल 1496) सुटल़ी या बसमध्ये प्रवाशांबरोबर विशेषतः विद्यार्थ्यांचा समावेश होत़ा दुपारी अडीचच्या सुमारास बस हातीस आडकरवाडी येथे आल़ी रस्त्यावर पाणी असतानाही त्यातून बस पुढे नेण्याचा प्रयत्न बसचालकाने केल़ा यावेळी चालकाला रस्त्याचा अंदाज न असल्याने बस रस्त्याकडेला कलंडल़ी बस कलंडल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व बसमधील विद्यार्थी व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल़े पावसामुळे सर्वत्र खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून बसचालकांनाही पाण्यात बस न घालण्याच्या सूचना यापूर्वीच विभागाकडून देण्यात आल्या आहेत़ असे असतानाही बसचालकाकडून बेजबादारपणे बस चालवल्याचे सांगितले जात आह़े यासंबंधी एसटी विभागाशी संपर्क साधला असता घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
संगमेश्वरात रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले
संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या रामपेठ, माखजन, फुणगूस बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. यावर खबरदारी म्हणून पूरग्रस्त भागातील रहिवाशाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. खेडमध्ये जगबुडीच्या पुराचे पाणी मटण-मच्छीमार्केटसह नजीकच्या दुकानात घुसताच साऱयांची धांदल उडाली. दरम्यान गेले 2 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने परशुराम घाटातील वाहतूक दुसऱया दिवशी मंगळवारीही बंदच ठेवण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच जिल्हय़ाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. हा पावसाचा जोर दुपारनंतर आणखीनच वाढला होता. त्यामुळे जिल्हय़ातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक मार्गावर या पावसामुळे अडथळे निर्माण झाल्याच्या घटना घडल्या. या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. सकाळपासूनच मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जिल्हय़ातील आपत्तीचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने तर पुढील आणखीन 4 दिवस रत्नागिरी, रायगड या जिल्ह्य़ांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे या आपत्तीचे संकट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिह्यात लांजात सर्वाधिक 342 मिमी पावसाची नोंद
जिल्हय़ात सोमवार सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये लांजामध्ये सर्वाधिक 342 मिमी पावसाची नोंद आहे.
कुंभार्ली घाटातही दरड कोसळली
मंगळवारी कोसळत असलेल्या मुसळधार पावसात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया कुंभार्ली घाटातही दुपारच्या सत्रात दरड कोसळली. प्रशासनाने तत्काळ जेसीबीसह कामगार पाठवून दरड हटवली. त्यांनतर काहीकाळ विस्कळीत झालेली वाहतूक पुढे एकेरी सुरू ठेवण्यात आली.
एनडीआरएफकडून पूर, दरडग्रस्त भागाची पाहणी चिपळुणात सोमवारी सायंकाळी दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकातील जवानांनी मंगळवारी सकाळपासून शहरातील सखल भागांमध्ये पाणी भरण्याचे ठिकाण असलेल्या पेठमाप, गोवळकोट धक्का, गोळकोट येथील दरड कोसळण्याचे संभाव्य ठिकाणांसह या भागांची पाहणी केली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी शहराच्या भौगोलिक रचनेबाबत त्यांना माहिती दिली.