विजय सरदेसाई यांच्या स्वप्नातला प्रकल्प : सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे निमित्त
प्रतिनिधी / पणजी
माजी उपमुख्यमंत्री व फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई उद्या रविवारी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. मात्र कोविड-19 मुळे असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत कोणताही सोहळा आयोजित करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, केवळ फातोर्डावासियांसाठीच नव्हे तर राज्यात नव्याने राजकारणात प्रवेश घेणाऱयांसाठी प्रशिक्षणासाठी तसेच राज्यात थिंकटँक तयार तयार करण्यासाठी रवींद्र केळेकर ज्ञानपीठ केंद्र, सार्वजनिक धोरण आणि संवाद अशा पद्धतीचे गोव्यातले हे पहिले केंद्र 14 रोजी सुरू केले जात आहे.
विजय सरदेसाई बालपणापासून राजकारणाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व. काँग्रेस पक्षात अनेक वर्षे वावरल्यानंतर व या पक्षाला चांगली उभारी दिल्यानंतरही आयत्यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. तथापि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी मिळवीत विजयी झाले. पाच वर्षे त्यांनी सत्ताधारी भाजपशी संघर्ष केला. अनेक विषय हाती घेतले. सरतेशेवटी गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन करून पुढील निवडणुकीत 2017 मध्ये विजय सरदेसाई आपल्यासह विनोद पालयेकर (शिवोली) व जयेश साळगावकर (साळगाव) हे विधानसभेवर निवडून आले.
काँग्रेसला धडा शिकवित आणले भाजप सरकार
विजयनी पुढाकार घेऊन राज्यात काँग्रेसला धडा शिकवित भाजपचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आणि मनोहर पर्रीकर मंत्रीमंडळात ते मंत्री बनले. पर्रीकरांनंतर डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले. काही महिन्यानंतर त्यांचे मंत्रीपद गेले व गोवा फॉरवर्ड पक्ष सत्तेतून बाहेर पडला आणि विरोधी पक्षात पोहोचला.
उद्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण
विजय सरदेसाई यांची कारकीर्द तशी संघर्षाची व न्यायासाठी झगडणारी, झुंज देणारी अशी त्यांची ही कारकीर्द. आता विरोधी पक्षात असले तरी राज्यात जनजागृतीचे अखंडपणे काम व मुख्य विरोधी पक्ष निष्प्रभ असला तरी गोवा फॉरवर्ड मात्र अन्य मुद्दे घेऊन जनतेबरोबर पुढे आला. त्यातून पक्ष संघटन पुढे आले. जनताही विजय सरदेसाई यांचे नेतृत्व मान्य करू लागले. राजकारणात अस्वस्थ असलेले विजय सरदेसाई हे उद्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतील.
…आणि एक स्वप्न साकार होतेय
विजय सरदेसाई यांचे एक स्वप्न होते. पक्ष संघटना व राजकारण करीत असताना त्या पलीकडे बरेच काही समाजसेवेच्या माध्यमातून करायचे आहे व त्यातील एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणजे फातोर्डा येथे त्यांनी उभारलेली पारंपरिक गोमंतकीय पद्धतीची तीन मजली इमारत. ग्रीन पद्धतीच्या या इमारतीत फातोर्डा जनतेचे कार्यालय, जिथे त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. एक मिनी सभागृह जे जनतेसाठी खुले राहील.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नव्याने राजकारणात येणारी मंडळी चारित्र्यवान असावीत, हुशार असावीत, अभ्यासू असावीत. समाजशास्त्राचे ज्ञान असावे यासाठी एक पिढी त्या अनुषंगाने प्रशिक्षित करून राजकारणात उतरविण्यासाठी मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण संस्थेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात प्रख्यात साहित्यिक रवींद्र केळेकर स्मृती संवाद केंद्र स्थापन केले जातेय. अशा तऱहेची ही गोव्यातील पहिलीच संस्था आहे. आपल्या वाढदिनाच्या निमित्ताने विजय सरदेसाई हे या इमारत प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी करीत आहेत. अनेक राजकीय संघर्ष व अडथळे पार करीत ते आपले स्वप्न साकार करीत आहेत.