अरगन तलावाशेजारील झाड ठरतेय वाहनधारकांना धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
वळीव पावसाच्या वाऱयामुळे शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर अरगन तलावाशेजारी झाड कोसळले आहे. पण सोमवार उजाडला तरी कोसळलेले झाड हटविण्याची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून झाड कधी हटविणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
वादळी पावसाच्या माऱयामुळे मोठय़ाप्रमाणात पडझड झाली आहे. विशेषतः झाडांची पडझड झाल्याने विद्युतखांबांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसात बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर हमखास झाडे कोसळण्याचे प्रकार घडत असतात. शनिवारी झालेल्या पावसामुळे अरगन तलावाशेजारी झाड कोसळले होते. रस्त्याच्या शेजारी झाड कोसळल्याने रहदारीस कोणताही त्रास झाला नाही. एरव्ही याठिकाणी विविध साहित्य विक्री करणारे व्यावसायिक बसलेले असतात. पण दुपारी पाऊस सुरू झाल्यामुळे व्यावसायिक घरी गेल्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. सध्या हे झाड हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. झाडे कोसळल्यानंतर तातडेने हटविण्यात येतात. पण सोमवार उजाडला तरी अरगन तलावाशेजारील झाड हटविण्यात आले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अडचण होत आहे.