कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीर संस्थानमध्ये आधुनिक शिक्षणाची सुरूवात छत्रपती राजाराम महाराजांनी (दुसरे) यांनी केली. ते स्वतः आधुनिक विचाराचे होते. आपल्या संस्थानात कायद्याचे राज्य असावे, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी ते आग्रही होते, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे यांचे सुपुत्र यौवराज शहाजीराजे छत्रपती यांनी केले.
येथील राजाराम महाविद्यालयात करवीरचे छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांची 150 वी पुण्यतिथी मंगळवारी साजरी करण्यात आली. यावेळी राजाराम महाराज ज्या पाटणकर घराण्यातून छत्रपती घराण्यात दत्तक आले, त्या पाटणकर घराण्याचे सदस्य असणारे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, त्यांचे सुपुत्र नकुल पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर, श्री.ऋतूराज इंगळे, राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनेत्रा महाराज-पाटील, डॉ. अंजली पाटील, डॉ. गाडे, प्रा. संजय पाठारे आदी उपस्थित होते.
युवराज शहाजीराजे म्हणाले, 1866 साली वयाच्या सोळाव्या वर्षी कोल्हापूरच्या गादीवर आलेले छत्रपती राजाराम महाराज दुसरे हे आधुनिक विचारांचे व शिक्षणाविषयी प्रचंड जागरूक वृत्तीचे होते. त्यांनी कोल्हापूरमध्ये सुसज्ज हायस्कूल बांधण्याचा निर्णय घेतला व आपल्या जुन्या राजवाडाच्या लगतच त्यासाठी नविन वास्तूची पायाभरणी केली. त्यावेळी केलेल्या भाषणात राजाराम महाराज म्हणाले होते, ज्या इमारतीचा शिलान्यास मी करीत आहे, त्या इमारतीने कोल्हापूर शहराला मोठी शोभा प्राप्त होणार आहे. विद्यावृद्धी हे किती महत्त्वाचे काम आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे. मला अशी खात्री आहे की शिक्षणप्रसाराला अलिकडे जे प्रोत्साहन देण्यात येत आहे, ते अल्पकालीन ठरणार नाही. लोकांच्या जुन्या समजुती नाहीशा होत जातील व विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल, असे म्हटले होते. ते भाषण शिक्षणाविषयी त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. दुर्दैवाने इमारत पूर्ण होत असतानाच इटली मधील फ्लोरेन्स येथे 30 नोव्हेंबर 1870 रोजी महाराजांचे अकाली निधन झाले. इटली मध्ये फ्लँरेन्स शहरात तेथील तत्कालीन सरकारने महाराजांचे स्मारक उभारले आहे. कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्या सन्मानार्थ या हायस्कूलला `राजाराम हायस्कूल’ असे नाव दिले. पुढे राजर्षी शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज तिसरे यांनी येथे कॉलेजचे वर्गही सुरू केले, अशी आठवणही शहाजीराजे यांनी सांगितली.
छत्रपती राजाराम महाराज दुसरे हे पाटणकर घराण्यातून छत्रपतीच्या घराण्यात दत्तक आले हेते. नागोजीराव पाटणकर असे त्यांचे जनक घराण्यातील नाव होते. त्यांनी करवीर संस्थानमधील रयतेला शिक्षणाबाबत समृद्ध करण्याचे आग्रही पाऊल टाकले. त्यांच्या काळात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला गेला, असे बाळ पाटणकर यांनी सांगितले.