मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी असा दौरा करणार आहेत. यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नाराजी व्यक्त करत राजकारण करत असल्याची टीका राज्य सरकार करत आहे. दरम्यान, यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांनी आज नांदेड विद्यापीठाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी राज्यपालांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावरुन राजकारण केलं जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “तुम्ही तर राजकारण करत नाही ना…मग जाऊद्या…” असं म्हणत प्रश्नाला बगल दिली.
राज्यपालांच्या नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याबाबत मुख्य सचिवांमार्फत राजभवनला कळवण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होईल, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.