ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या काही दिवसात ज्या घटना समोर येत आहेत, त्या अत्यंत चिंताजनक आहे. या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाही. असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुढे ते म्हणालेे, मुख्यमंत्र्यांचे मौन हे चिंताजनक आहे.
भाजपचे शिष्टमंडळाने आज मुंबईतील राजभवनामध्ये जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणांवर काही बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे. राज्यपालांना भेटून आम्ही मागणी केली की, राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून अहवाल घेतला पाहिजे यासाठी आम्ही राज्यपालांना भेटलो.
पुढे ते म्हणाले, शरद पवारांनी दोन प्रेस घेतल्या. पण त्यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगवेगळे बोलतात. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल विचारताना, काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे सांगावे, असे म्हटले आहे.