प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्याचा विकास करण्यात येत असून टिळकवाडी परिसरातील रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. येथील रानडे रोडच्या डांबरीकरणासाठी रस्त्याची खोदाई करून खडी पसरण्यात आली आहे. पण काम रखडल्याने वाहनधारक आणि रहिवाशांचे हाल होत असल्याने डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काही रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. काही रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. बहुतांश रस्त्यावर पेव्हर्स घालून रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. रानडे रोडची दुर्दशा झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच खड्डय़ामुळे वाहनधारक आणि रहिवाशांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. रस्त्याचे काम करण्यासाठी खडी घालण्यात आली आहे. पण सध्या काम थांबल्याने वाहनधारक आणि रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. खडीमुळे वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे प्राधान्य देऊन रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.