ऑनलाईन टीम / पुणे :
प्रत्येक देशाच्या अस्मिता ह्या त्या-त्या देशाची, राष्ट्राची मोठी शक्ती असते. ती शक्ती राष्ट्राचे गौरव आणि सन्मान वाढवत असते. राममंदिर हा भारताच्या अस्मितेचा, राष्ट्रजागरणाचा विषय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले.
साप्ताहिक विवेकच्या आगामी ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त दि.27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्र जागरण व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. भैय्याजी जोशी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर संकल्पना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
यावेळी बोलताना भैयाजी म्हणाले, राममंदिर आंदोलनाच्या इतिहासातील 5 ऑगस्ट 2020 हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवसापासून आपली राममंदिर ते राष्ट्र मंदिर ही वाटचाल सुरू आहे. देशाच्या अस्मितेच्या जागरणाला सोमनाथ मंदिरापासून सुरुवात झाली. देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक संकट असतानाही सोमनाथाचे भव्य मंदिर उभे राहिले. पुढेसुद्धा ही गुलामीची प्रतिके दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. या कालक्रमामध्ये अयोध्येचे स्थान वेगळे आहे.
साडेचार हजार वर्षांपूर्वी देशावर आक्रमण केलेल्या व्यक्तीने विजयाचे चिन्ह म्हणून अयोध्येतील रामजन्मभूमीवर ढाचा उभा केला, त्याला स्वतःचे नाव दिले. जगातील कोणतेही मशीद व्यक्तीच्या नावाने ओळखली जात नाही पण अयोध्येतील मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभी राहिली. समाजाची मानसिकता दुर्बल करणे हा यामागील हेतू होता.