वार्ताहर/ राजापूर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने उध्दव ठाकरे सर्वांचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही ते लवकरच भेट देतील. भेट निश्चितीची प्रक्रिया सुरू असून त्यांना लवकरच कळवले जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री अनिल परब यांनी राजापूर भेटीदरम्यान दिली.
रिफायनरी प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात समर्थन लाभत असताना समर्थकांची बाजू ऐकूण घेण्यासाठी मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी भेट द्यावी, या मागणीकरीता जिल्हय़ातील फार्डच्या वतीने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राजापूर दौऱयावर आलेले पालकमंत्री ना. परब यांना पत्रकारांनी याबाबत छेडले असता त्यांनी ही माहिती दिली.
फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाला विरोध करत शिवसेनेने आपण जनतेच्या बाजूने असल्याचे म्हणत प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची अधिस्चूना रद्द करून घेतली होती. त्यानंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. सद्यस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध मावळला असून समर्थन वाढत आहे. येथील जनतेला नाणार प्रकल्प हवा आहे. मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यानी समर्थकांची बाजू ऐकून घेण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी गेले वर्षभर समर्थकांनी लावून धरली आहे. स्थानिक आमदार व खासदार ती भेट घडू देत नाहीत असा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे. आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जनतेला उपोषण छेडावे लागते, आता तरी मुख्यमंत्री समर्थकांना वेळ देणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी पालकमंत्र्यांना केला. त्यावेळी बोलताना त्यांनी नाणार प्रश्नी शिवशेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच निर्णय घेतील. समर्थकानी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावर प्रक्रिया सुरू असून मुख्यमंत्री म्हणून ते त्यांची बाजू नक्कीच ऐकून घेतील. या भेटी संदर्भात लवकरच कळवले जाईल असे ना. परब यांनी स्पष्ट केले.