केंद्रीय पेट्रोलियममंत्री रत्नागिरीवरच ठाम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच, असा पुनरुच्चार नवी दिल्लीत नुकताच केला. दुसरीकडे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रिफायनरी राजापुर तालुक्यातच व्हावी यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे प्रचंड रोजगार क्षमता असलेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
2 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा महाकाय रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आला होता. स्थानिक जनतेच्या व शिवसेनेच्या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने घेतली होती. तथापि स्थानिकांच्या मागणीप्रमाणे रिफायनरी होण्यासाठी आम्ही सकारात्मक राहू, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.
रत्नागिरी रिफायनरीच्या उच्च पदस्थानी विविध नेत्यांकडे तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱयांकडे रिफायनरीविषयी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. याबाबत अनेक बैठकाही पार पाडल्या. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त रत्नागिरी रिफायनरीची जाहिरातही छापून आली. दुसरीकडून प्रचंड रोजगार क्षमतेच्या या प्रकल्पामुळे जिल्हय़ाचाच नव्हे तर कोकणचा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त करत समर्थकांनीही प्रकल्प पुन्हा राजापुर तालुक्यातच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले असून त्यात रिफायनरी जागा निश्चितीचा निर्णय लवकररात लवकर घ्यावा, असे आवाहन केले आहे. कोरोनानंतर राज्यात व देशात खूप मोठी मंदी येऊ घातली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे व त्याला सरकारने पुन्हा मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पत्रानंतर रिफायनरी समर्थनार्थ पुन्हा मोठी ताकद एकवटू लागली आहे.
सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
आम्ही राज्य सरकारला पत्र लिहून कळवले आहे की, विरोधकांची वस्ती वगळून अन्य भागात प्रकल्प व्हावा. नाणार गाव, दत्तवाडीसारखे भाग वगळले गेल्यास विरोधाचा मुद्दा संपुष्टात येईल आणि राज्याच्या व देशाच्या हिताचा हा प्रकल्प मार्गी लागण्यास कोणतीच अडचण शिल्लक राहणार नाही. राज्य सरकारकडून आम्हाला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पंढरीनाथ आंबेकर, रिफायनरी समर्थक