एप्रिलअखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्मयता : नूतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात, युद्धपातळीवर काम सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 20 टक्के काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्मयता आहे. रेल विकास निगमचे अधिकारी युद्धपातळीवर काम पूर्ण करत असून काही दिवसांत बेळगावमध्ये अत्याधुनिक रेल्वेस्थानक पाहता येणार आहे.
बेळगाव रेल्वेस्थानक हे देशातील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. दररोज 13 ते 14 हजार प्रवासी लोंढा ते मिरज या दरम्यान प्रवास करतात. 1887 मध्ये बेळगाव रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम झाले होते. ब्रिटिशकालीन इमारतीचे सध्या नूतनीकरण केले जात आहे. 28 फेबुवारी 2019 ला नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कै. खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते झाले होते. बेळगावचे आर्किटेक्ट बकुळ जोशी यांनी नूतन इमारतीचे डिझाईन केले आहे.
असे असणार रेल्वेस्थानक
रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक प्रकारचे बुकिंग काऊंटर, प्रवाशांसाठी वेटिंग रुम, फूडकोर्ट यासह इतर व्यवस्था देण्यात आल्या आहेत. प्लॅटफार्म क्रमांक एक वर शेडची निर्मिती करण्यात आली आहे. याचसोबत रेल्वेस्थानकामध्ये कोचिंग डेपो उभारण्यात आला आहे. शहराच्या दक्षिण भागातील प्रवाशांसाठी शास्त्रीनगर येथून दक्षिण प्रवेशद्वार उभारण्यात आला आहे. प्लॅटफार्मची संख्याही वाढविली जाणार आहे.
एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना : मंगला अंगडी (खासदार)
बेळगाव रेल्वेस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मध्यंतरी कोरोनामुळे कामगार गावी परतल्याने कामाला विलंब झाला. परंतु सध्या गतीने काम सुरू असून एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना अधिकारीवर्गाला करण्यात आली आहे. अत्याधुनिक अशा सर्व सुविधांनीयुक्त असे हे रेल्वेस्थानक लवकरच बेळगावकरांच्या सेवेत दाखल होईल, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
येत्या काही दिवसांमध्ये काम पूर्ण होईल : अरुणकुमार पाटील (रेल विकास निगमचे अधिकारी)
रेल विकास निगमकडून बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. मुख्य इमारतीचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के अद्याप बाकी आहे. हे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल. या इमारतीसोबत कोचिंग डेपो व दक्षिण प्रवेशद्वार उभारण्यात आले असल्याची माहिती अरुणकुमार पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.