बुधवारपासून पुलावरून वाहतूक बंद, पूलाच्या पीअरमधील निघाले दगड
गुहागर / प्रतिनिधी
रेवस रेड्डी या प्रमुख सागरी मार्गावरील गुहागर तालुक्यातील पालशेत येथील पुलावरून गेलेल्या पाण्याने पूलाचे तीन पीअर मधील दगड निघाल्याने सदर पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरून बुधवारी 14 जुलैपासून पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या उप अभियंता सलोनी निकम यांनी सांगितले आहे.
पालशेत मधील या पुलावरून जून महिन्यातही पाणी वाहून गेले होते. रविवार पासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी रात्रीपासून या पुलावरून पाणी जात होते सोमवारी पालशेत बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. पुलावरून अडीच फूट उंचीचे पाणी गेल्याने व पाण्याबरोबर मोठे वृक्ष येऊन या पुलावर आदळल्याने पुलाच्या तीन पीअर मधील दगड निघाले आहेत, परिणामी या पावसा मध्ये पूल धोकादायक बनला असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांनी जाहीर केले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुरुस्ती होईपर्यंत या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
पुलाच्या दुरुस्ती करता दहा दिवसांचा कालावधी सार्वजनिक बांधकाम विभागाने अपेक्षित धरला आहे. पुलावरून वाहतूक बंद झाल्याने अडूर, वेळणेश्वर, नरवण आदी ग्रामीण भागात जाणारी एसटी सेवा ही बंद पडणार आहे. छोटी वाहने मारुती मंदिर येथून रामाणे वाडी मार्गे प्रवास करू शकतात. मात्र मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. याबाबत गुहागर तहसीलदार तसेच एसटी आगार प्रमुख, पालशेत ग्रामपंचायत, गुहागर पोलीस ठाणे गुहागर पंचायत समिती यांना कळविण्यात आले आहे.