प्रतिनिधी / इस्लामपूर
शहीद रोमीत चव्हाण यांच्यावर वारणा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या २४व्या वर्षी जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना रोमीत चव्हाण यांना हौतात्म्य आले. रोमीत यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. हे वाळवा तालुका कधीच विसरणार नाही. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यात सामील व्हायचे. हे रोमीत यांचे लहानपणापासूनचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. तसेच सैन्यात काम करताना एक धाडसी आणि कर्तव्यदक्ष जवान असे नावलौकिक मिळवले. आपल्या देशाबद्दल असीम श्रद्धा असलेल्या रोमीत यांना अतिशय कमी वयात आपले प्राण गमवावे लागले, याचं दु:ख वाटते, अशा भावना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.