खाद्यमहोत्सवात करवंदाच्या रसाची सव्वा लाख रुपयांची उलाढाल
सुधाकर काशीद,तरुणभारत
‘काळी काळी मैना.. डोंगरची रैना .., खायाला पैना ..आणि एवढाच महिना ….’ अशी आरोळी देत करवंदेवाला दारात आला की आपली लगेच त्याच्याशी घासाघीस सुरु. दहा रुपयाची करवंदे पाच रुपयाला मिळाली की अनेकजण धन्य. करवंदे काढायला ही माणसे काटय़ाकुटय़ात जंगलात कशी फिरली असतील याची बहुतेकांना काही घासाघीस करताना जाणिवच नसते. त्यामुळे होईल तेवढीच कशीबशी कमाई करायची एवढेच करवंद विक्रेत्यांना माहित असते. पण त्याच्या माध्यमातून केवळ तीन आठवडय़ात महिला बचत गटाने सव्वा लाख रुपयांची कमाई केली आहे. रानमेवा त्याचे मूल्य कसे लाख मोलाचे असते हेच या निमित्ताने सर्वांसमोर आले आहे.
राजर्षी शाहू स्मृती पर्वाच्या निमित्ताने तीन आठवडे शाहू मिलमध्ये खाद्यमहोत्सव चालू होता. नो पिझ्झा, नो बर्गर, नो पाणीपुरी, नो चाट असे त्याचे स्वरूप होते. केवळ आणि केवळ घरगुती खाद्यपदार्थ हे या खाद्य महोत्सवाचे वेगळेपण होते. या महोत्सवात हा करवंदाच्या रसाचा स्टॉल या महिला बचत गटाने उभा केला होता. आणि त्याला मोठी पसंती मिळाली. तब्बल सव्वा लाख रुपयाच्या करवंदाच्या रसाची या ठिकाणी विक्री झाली. एकावेळी लाख, सव्वा लाख रुपयाची पुंजी आणि तीही एरवी मातीमोल समजल्या जाणाऱया करवंदाच्या माध्यमातून येथे जमा झाली.
शेनवडे (तालुका गगनबावडा) येथील गगनगिरी महिला बचत गट आहे. तो परिसर करवंदे, जांभळे, आवळा, नेरली या रानमेव्याने भरून जातो. करवंदे जांभळे विकून तेथील माणूस चटणी मिठासाठी थोडीफार कमाई करतो. काटय़ाकुटय़ातून गोळा केलेली करवंदे पाच-दहा रुपये द्रोण या दराने विकतो. या करवंदात खूप औषधी गुणधर्म असतात. पण त्याचे मोल बहुतेकांना माहित नाही. त्यामुळे करवंदे फांद्यावरच गळून पडतात. किंवा घासाघीस करून अतिशय अल्प दरात विकली जातात.
या पार्श्वभूमीवर कृष्णराव माळी व बापू जाधव यांनी पुढाकार घेऊन करवंदे गोळा करण्यास सुरुवात केली. वीस, पंचवीस, तीस रुपये किलो दराने या परिसरातील वाडय़ा वस्तीवर जाऊन करवंदे विकत घेतली. व त्याचा शेनवडे येथे रस काढून विक्री सुरू केली. त्या करवंदाच्या रसाची चव इतकी भारी की, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने शाहू मिलमध्ये या करवंदाचा स्टॉल उभा केला. आणि सव्वा लाख रुपयांची उलाढाल करून त्याचे महत्त्व अधोरेखित करून गेला.
करवंदे, जांभूळ ,आवळा, नेरली, आळु हा रानमेवा आहे. त्याची किंमत अमूल्य आहे. पण तो मातीमोल दराने वाडय़ावस्तीवरचे लोक विकतात. आम्ही त्याचे मूल्य ओळखून नव्या रूपात करवंदाची विक्री केली. व त्याचे महत्त्व काय असते हे सर्वांना बऱयापैकी पटवून दिले.