विधि शाखेच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा : ऑनलाईन परीक्षेत घोळ झाल्याचा विधि विद्यार्थी कृती समितीचा आरोप : फेरमुल्यांकनाची शिवाजी विद्यापीठाकडे मागणी
संजीव खाडे / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाने मार्चमध्ये घेतलेल्या विधि शाखेच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप होत आहे. शेवटच्या वर्षातील लेबर लॉ विषयाच्या पेपरचा निकालात तब्बल साडेतिनशे विद्यार्थी नापास झाले आहेत. ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक गोंधळ झाल्याने हे विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप करत विधि विद्यार्थी कृती समितीने या पेपरच्या फेरमूल्यांकनाची मागणी केली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ आणि कायद्याचे विद्यार्थी यांच्यात लेबर लॉ च्या परीक्षा निकालावरून संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे शिवाजी विद्यापीठाने विधि शाखेचे अर्थात लॉच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. यामध्ये शेवटच्या वर्षातील पहिल्या सेमिस्टरमधील पाच पेपर झाले. सिव्हिल प्रोसिजर कोड अँड लिमिटेशन ऍक्ट, लॉ ऑफ इव्हिडन्स, लेबर लॉ, लँड लॉ, ड्राफ्टिंग अँड टेडिंग कॉन्व्हर्सी या विषयांचे पेपर झाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. पाच पेपर पैकी लेबर लॉ च्या पेपरमध्ये तब्बल साडेतिनशे विद्यार्थी नापास झाल्याचे उघड झाले. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला आहे.
विधि शाखेच्या अंतिम वर्षातील पेपरमध्ये पास होण्यासाठी किमान 50 टक्के गुण मिळवावे लागतात. लेबर लॉच्या पेपरमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 44 आणि 48 असे गुण मिळाल्याची माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली. इतर चार पेपरमध्ये उत्तम गुण मिळविणारे विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने लेबर लॉच्या पेपरमध्ये कसे नापास होऊ शकतात. नापास झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण 44 किंवा 48 कसे? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. ऑनलाईन परीक्षेत जे सॉफ्टवेअर वापरण्यात आले, त्यामध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याने नापास गुणांचा घोळ झाल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी सुरू केले आहेत.
पेपरच्या फेरमूल्यांकनाची मागणी
दरम्यान, लेबर लॉच्या पेपरमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनाची मागणी केली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक, विधि विभागाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे विद्यार्थी कृती समितीचे पदाधिकारी प्रदीप मकने यांनी सांगितले. लेबर लॉच्या पेरपरमध्ये विद्यार्थ्यांना काय चुकले, काय बरोबर होते, हे समजण्यासाठी फेरमूल्यांकनाची गरज आहे. जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये होणाऱया ऑल इंडिया बार असोसिएशनच्या परीक्षेलाही त्यांना बसता येणार नाही, असेही मकने यांनी सांगितले.
25 प्रश्न, प्रत्येकी 2 गुण
लेबर लॉच्या पेपरमध्ये 25 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला 2 गुण देण्यात येतात. त्यामुळे ही परीक्षा पन्नास गुणांची असते. प्रत्यक्षात गुण देताना ते पन्नास ऐवजी शंभरपैकी दिले जातात. त्याचबरोबर परीक्षवेळी जे सर्क्युलर जारी करण्यात आले तेंव्हा रिव्हॅल्युएशन अर्थात फेरमूल्यांकन होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आल्याची माहित विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.
पुनर्निरिक्षण करणार : प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे
शिवाजी विद्यापीठाच्या लॉच्या बोर्ड ऑफ स्टडिजचे (विधि अभ्यास मंडळ) चेअरमन प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे यांच्याकडे या प्रकाराबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले, परीक्षेत त्रुटी राहिलेली नाही. एखादा पेपर अवघड निघतो. पण गेल्या दोन ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुणांची सवय झाली आहे. विद्यार्थी घरातून परीक्षा देतात. कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण सिस्टिममध्ये घोळ असता तर इतर पेपरमध्येही घोळ झाला असता. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे परीक्षेवेळी प्रॉक्टरींग मेकॅनिझम आम्ही वापरले नाही. अन्यथा त्याचा काय प्रभाव आहे, हे विद्यार्थी जाणतात. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही आपली भावना आहे. त्यासाठी पुनर्निरीक्षण करणार आहे. विद्यापीठाने मला जबाबदारी दिली आहे, असेही डॉ. चव्हाटे यांनी सांगितले.