प्रतिनिधी / कणकवली:
शासनाने शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत विकेंड लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे इमर्जन्सी वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. याचा मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला. सकाळच्या सत्रातील किरकोळ अपवाद वगळता एसटी बससेवा पूर्णत: बंद राहिल्याचे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
रा. प. महामंडळाला बससेवा बंद ठेवण्याबाबतच्या कोणत्याही सूचना प्राप्त नव्हत्या. मात्र, प्रवासी उपलब्ध झाल्यास बससेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रवासी उपलब्ध नसल्याने बससेवा सुरू होऊ शकली नाही. रात्रवस्तीला गेलेल्या काही बसेस सकाळच्या सत्रात धावताना दिसल्या. मात्र, त्यात प्रवासी नव्हते. विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाल्याने लोकांनी बाहेर न पडणेच पसंत केले. परिणामी बाजारपेठांमधील शुकशुकाटामुळे बसस्थानकेही ओस पडली होती. लांब पल्ल्याला गेल्या व शनिवार, रविवार जिल्हय़ात येणाऱया गाडय़ांनाही प्रवासी नसल्याने त्या सोमवारपर्यंत त्या – त्या ठिकाणी थांबविण्यात आलेल्या होत्या, असे एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रवाशांचे हाल
रेल्वेने आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने काही प्रवासी चालतच बसस्थानकावर आले. मात्र, तेथूनही बसेसची सोय नसल्याने त्यांना मिळेल त्या वाहनाचा किंवा गावातून वाहन बोलावून घरी जावे लागले.