बेळगावमध्ये कोरोनाच्या वाढत्या धास्तीने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन
प्रतिनिधी/ बेळगाव
शुकशुकाट… शांतता… स्तब्धता…. ना वाहनांचे आवाज… ना विक्रेत्यांचा गलबला.. ना ग्राहकांची गर्दी… निर्मनुष्य रस्त्यांवर कोरोनाचीच धास्ती अशा वातावरणात लॉकडाऊनमधील तिसरा आठवडी बाजार कोरडाच गेला. बेळगावमध्ये कोरोनाची वाढती धास्ती विचारात घेऊन संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी रविवारपेठ बंद करण्यात आली. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या निमित्ताने सुरू असणारा बाजार शुक्रवारपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे बाजार विरळ होऊन आठवडी बाजार तर पुरता लॉकडाऊनमध्ये बुडून गेला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच सुरक्षितता म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. पुढे परिस्थितीनुरुप लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने परिणामी बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून सकाळच्या वेळेत सुरू असणाऱया सेवेचा आधार घेत नागरिकांकडून गरज भागविली जात होती. मात्र, जनता कर्फ्युप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले असल्याने बाजारपेठांमध्ये केवळ निर्मनुष्य रस्ते, शटर डाऊन असलेले गाळे, बंद असलेल्या टपऱया, दुकानांचा आडोसा घेऊन सावलीत पहुडलेली भटकी जनावरे असे चित्र अनुभवायला मिळत आहे.
कोरोनाच्या संकटछायेत बेळगावकरांना आठवडी बाजारात कडधान्यांपासून जीवनावश्यक वस्तुंपर्यंतचे साहित्य मिळणे कठीण झाले आहे. यामुळे आठवडी बाजाराचे महत्त्व आणि त्यावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे या परिस्थितीमुळे अडचणीत आली आहेत. आठवडी बाजारात विविध साहित्य विक्री करणाऱया विपेत्यांनी आपल्या गल्लीत, चौकात हातगाडीच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य तसेच भाजी-फळे विक्री करत असून सलग चौथा आठवडी बाजार आर्थिक उलाढालीपासून हुकला आहे.