हाय व्होल्टेज लढतीत शाहीनकडून शॉक ट्रीटमेंट! भारताची वर्ल्डकपमधील अपराजित परंपरा अखेर खंडित,
रिझवान-आझमची 152 धावांची अभेद्य भागीदारी
वृत्तसंस्था/ दुबई
हाय व्होल्टेज लढतीत शाहिन आफ्रिदीची (3-31) शॉक ट्रीटमेंट आणि मोहम्मद रिझवान (55 चेंडूत नाबाद 79), बाबर आझम (52 चेंडूत नाबाद 68) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून अक्षरशः फडशा पाडत नवा इतिहास रचला. शाहिनने रोहित-राहुल यांना स्वस्तात गारद केल्यानंतर त्यातून सावरत भारताने 7 बाद 151 धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. पण, प्रत्युत्तरात रिझवान व भारताविरुद्ध नेहमीच त्वेषाने खेळणाऱया बाबर आझमच्या झंझावाताने विराटसेनेची लक्तरे जणू वेशीवर
टांगली.
विजयासाठी 152 धावांचे आव्हान असताना रिझवान व बाबर आझम यांनी पहिल्या षटकापासूनच आक्रमक फटकेबाजीवर भर दिला आणि हीच रणनीती पाकिस्तानला 10 गडी राखून विजय मिळवून देण्यात निर्णायक ठरली. रिझवान 55 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 79 तर बाबर आझम 52 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 68 धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, शाहिन आफ्रिदीच्या सनसनाटी गोलंदाजीमुळे एकवेळ 3 बाद 31 अशी दैना उडालेल्या भारतीय संघाने विराट कोहलीच्या (49 चेंडूत 57) तडफदार अर्धशतकामुळे या साखळी सामन्यात 7 बाद 151 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानतर्फे शाहिन आफ्रिदीने तिखट मारा करताना 31 धावात 3 बळी घेतले. हसन अलीला देखील दुहेरी यश मिळाले.
केएल राहुल व रोहित शर्मा हे दोन्ही दिग्गज सलामीवीर अतिशय स्वस्तात बाद झाल्याने भारताची या महत्त्वपूर्ण लढतीत 2.1 षटकात 2 बाद 6 अशी दैना उडाली. त्यातच सुर्यकुमार यादव तिसऱया गडय़ाच्या रुपाने 11 धावांवर बाद झाल्याने भारतीय संघाची 3 बाद 31 अशी आणखी घसरण झाली. सुर्यकुमार यादवने प्रारंभी काही आक्रमक फटकेबाजी करत आशाअपेक्षा निर्माण केल्या. पण, हसन अलीच्या ऑफसाईड ऑफस्टम्पवरील उत्तुंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न चुकला आणि रिझवानने सोपा झेल टिपत भारताला आणखी एक झटका दिला.
त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्यावर अधिक भर दिला आणि या रणनीतीमुळे भारताला मजल-दरमजल प्रवास करता आला.
पाचव्या षटकात विराटने शाहीन आफ्रिदीला लेगसाईडला सणसणीत षटकार खेचत आपला क्लास दाखवून दिला आणि यावर शाहिनकडे हताश होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुर्यकुमारचे बाद होणे मात्र आणखी एक धक्का देणारे ठरले.
सुर्यकुमार तंबूत परतल्यानंतर विराटने रिषभ पंतच्या साथीने धावफलक हलता ठेवण्यावर अधिक भर दिला. सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना सावध पवित्र्यावर भर देणे भाग होते आणि या जोडीने प्रारंभी नेहमीच्या आक्रमक पठडीतील फटके खेळणे शिताफीने टाळले. रिषभ पंतने किंचीत जम बसल्यानंतर मात्र आपल्या नैसर्गिक शैलीला मुरड न घालता आक्रमक फटक्यांवर भर देणे पसंत केले. रिषभचा रिव्हर्स स्विपचा प्रयत्न फसल्यानंतर पंचांनी नाबाद दिल्याने पाकिस्तानने डीआरएस घेतला होता. पण, यात त्यांना फारसे काही निष्पन्न झाले नाही.
रिषभ पंतने हसन अलीला 11 व्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर षटकारासाठी पिटाळून लावत आपले उपद्रवमुल्य दाखवून दिले. यातील पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तर दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने एकहाती षटकारासाठी भिरकावून दिला. पंतचा देखील उत्तम जम बसल्याचे संकेत होते. पण, 13 व्या षटकातील दुसऱया चेंडूवर शदाबकडे परतीचा झेल टिपत पंतने तंबूचा रस्ता धरला.
त्यानंतर डावखुऱया रविंद्र जडेजाने 13 धावांवर बाद होण्यापूर्वी विराटच्या साथीने किंचीत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने हसन अलीच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू मोहम्मद नवाझकडे झेल दिला. अर्धशतक झळकावणाऱया विराट कोहलीने नंतर 19 व्या षटकात शाहीनच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीमागे रिझवानकडे सोपा झेल दिला. केवळ फलंदाज या नात्याने संघात असलेल्या हार्दिक पंडय़ाने 8 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. भुवनेश्वर 4 चेंडूत 5 तर शमी एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिले.
भारताने या लढतीसाठी इशान, अश्विन, राहुल चहर व शार्दुल ठाकुर यांना विश्रांती दिली तर पाकिस्तानने हैदर अलीला वगळण्याचा निर्णय घेतला
होता.
जेव्हा केएल राहुल नोबॉलवर बाद झाला!
पहिल्या षटकात रोहित बाद झाल्यानंतर शाहीनने डावातील तिसऱया व आपल्या दुसऱया षटकात केएल राहुलचा त्रिफळा उडवत भारताला आणखी एक जबरदस्त झटका दिला. टप्पा पडल्यानंतर किंचीत वळलेल्या चेंडूने यष्टी उदध्वस्त केली, त्यावेळी क्षणभर केएल राहुलसाठी देखील हा मोठा धक्का होता. मात्र, रिप्लेत हा नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले. ट्वीटरवर याच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या.
भारत असा कधी हरला नव्हता, आणि पाकिस्तान असा कधी जिंकला नव्हता!
भारताने नाणेफेक हरली, त्याचवेळी चाहत्यांच्या मनात साशंकतेची पाल चुकचुकली होती. पण, विराटने तडफदार अर्धशतक झळकावल्यानंतर भारताने 151 धावांपर्यंत मजल मारली असल्याने थोडीफार आशा होती. पण, प्रत्यक्षात बाबर आझम व रिझवान यांच्या चौफेर धुलाईमुळे हा सामना एकतर्फी ठरला. भारताच्या जखमेवर आणखी मीठ चोळणारी बाब म्हणजे भारत आजवर कोणत्याही टी-20 लढतीत कधीही 10 गडय़ांनी पराभूत झाला नव्हता आणि पाकिस्तान आजवर कधीही टी-20 लढतीत 10 गडी राखून जिंकला नव्हता. या एकाच लढतीत या दोन्ही निकषावर भारताला जबरदस्त झटका बसला.
अखेर पाकिस्तानने मौका साधला!
भारत-पाकिस्तानचे संघ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मागील 29 वर्षांच्या कालावधीत आमनेसामने भिडण्याची ही 13 वी वेळ होती आणि 13 हाच आकडा भारताच्या जणू आड आला. भारत-पाकिस्तान यांच्यात यापूर्वी विश्वचषकात 7 वनडे व 5 टी-20 लढती झाल्या आणि या 12 वेळा भारतच विजयी ठरला होता. दोन्ही संघ सिडनीत 1992 मध्ये सर्वप्रथम आमनेसामने भिडले, तेव्हापासून ही परंपरा अबाधित होती. रविवारी मात्र दुबई स्टेडियमवर 13 व्या वर्ल्डकप लढतीत भारताचेच खऱया अर्थाने तीन-तेरा वाजले!
हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वरला खेळवण्याचा हट्ट नडला!
मागील कित्येक महिन्यांपासून 100 टक्के तंदुरुस्त नसलेल्या हार्दिक पंडय़ाला व दुखापतीतून सावरलेल्या, पण, फॉर्ममध्ये नसलेल्या भुवनेश्वरला खेळवण्याची भारताला या लढतीत पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली. हार्दिक पंडय़ा 8 चेंडूत 11 धावा जमवल्यानंतर अगदी क्षेत्ररक्षणासाठी मैदानातही उतरु शकला नाही तर भुवनेश्वरने 3 षटकात 25 धावा देत वर्चस्व गाजवण्याची नामी संधी गमावली.
अन् भारताला यजुवेंद्र चहलची प्रकर्षाने उणीव जाणवली!
भुवनेश्वर, शमी, बुमराह, चक्रवर्ती व रविंद्र जडेजा असे 5 स्पेशालिस्ट गोलंदाज खेळवणाऱया भारतीय संघाला या लढतीत मोक्याच्या क्षणी यजुवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजीची प्रकर्षाने उणीव जाणवली आणि ते साहजिकही होते. वरुण चक्रवर्ती व अनुभवी जडेजा हे दोन्ही फिरकीपटू पाकिस्तानी फलंदाजांच्या धावा रोखू शकले नाहीत आणि त्यानंतर 151 धावांचे संरक्षण शक्य नाही, ही काळय़ा दगडावरची पांढरी रेघ होती.
रोहित शर्माचा गोल्डन डक आणि भारताला पहिला धक्का!
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर उपकर्णधार रोहित शर्मा आपल्या पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला आणि या सामन्याला अतिशय सनसनाटी सुरुवात झाली. शाहीन आफ्रिदीचे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी इनकटर नेहमीच धोकादायक असतात, त्याची प्रचिती रोहित पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने आली. शाहीनचा यॉर्कर लेंग्थवरील चेंडू मिडविकेटच्या दिशेने फटकावण्याचा रोहितचा प्रयत्न त्याच्यावरच उलटला आणि भारताच्या या दिग्गज फलंदाजाला गोल्डन डकची नामुष्की पत्करावी लागली.
पाकिस्तानच्या डावखुऱया गोलंदाजांची हुकूमत
स्पीडस्टार शाहिन आफ्रिदी आणि फिरकीपटू इमाद वासिम या दोन्ही डावखुऱया गोलंदाजांनी आपल्या पहिल्या 2 षटकात भारताला चांगलाच लगाम घातला आणि सामन्याचा जणू नूरच पालटून गेला. या दोन्ही डावखुऱया गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज सातत्याने झगडत राहिले आणि याचा संघाच्या धावगतीवर विपरित परिणाम दिसून आला.