प्रतिनिधी/ चिपळूण
गुरूवारी झालेल्या महापुरात वाशिष्ठीच्या दोन्ही पुलांच्या मध्येच असलेला 15 मीटरचा भराव वाहून गेला. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान यानंतर शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चाचणीनंतर आज रविवारी सायंकाळपासून हलक्या वाहनांना या पुलावरून सोडण्यात येणार असल्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन वाशिष्ठी नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये दुरूस्ती सूचवली होती. मात्र
कोणताही धोका नसल्याचा अहवाल दिलेला असतानाही पूल कसा खचला, असा सवाल खासदार विनायक राऊत यानी शनिवारी महामार्ग विभागाच्या अधिकाऱयांना
केला. दरम्यान शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या चाचणीनंतर रविवारी सायंकाळपासून लहान वाहने या पुलावरून सोडण्यात येतील, असे सांगण्यात आले.
सावित्री पूल दुर्घटनेत 42 जणांचा बळी गेल्यानंतर महामार्गावरील पुलांच्या सुरक्षिततेबाबतच्या सर्वच पुलांच्या सद्यस्थितीची तपासणी नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियातर्फे घेऊन ध्रुव कन्सल्टन्सीकडून सतत 3 वर्षे महामार्गावरील पुलांची तपासणी केली. यामध्ये वाशिष्ठी नदीवरील 2 पुलांचा समावेश होता. या पुलाची दुरूस्ती सूचवतानाच कोणताही धोका नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र गुरूवारच्या महापुरात या दोन्ही पुलांच्या मध्येच असलेला 15 मीटरचा भराव वाहून गेला. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. ऑडिटमध्ये फक्त पूल, भराव नाही, यासंदर्भात शनिवारी येथील पचायत समितीच्या सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत अधिकाऱयांची आढावा बैठक झाली. यात खासदार राऊत यांनी महामार्गचे अधिकारी शेख याना हा पूल आणि स्ट्रक्चरल ऑडीट या बाबत विचारणा केली. त्यावेळी शेख यानी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले दोन्ही पूल सुस्थितीत आहेत. मात्र पुलांच्यामध्ये असलेला 15 मीटरचा मातीचा भरावच वाहून गेला आहे. यावर काहीसे संतप्त होत राऊत यांनी पुलाचे ऑडीट म्हणजे नेमके काय केले. भराव त्यामध्ये येत नाही. एका टोकापासून पुलाच्या दुसऱया टोकापर्यत तपासणी करताना जर मधील भरावाची तपासणी केली नसेल तर नेमके ऑडीट काय केले, असा सवाल करत या बाबत सबंधित एजन्सीला तत्काळ बोलावून घ्या, यासंदर्भात त्यांना जाब विचारावा लागणार आहे, असे सांगितले.
दरम्यान पुलाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना शेख यानी वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकून त्यावर कॉंक्रिटचा थर टाकला जात आहे. त्यानंतर त्यावर वजन ठेवून उद्यापर्यंत त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर वाहतूक सुरू केली जाईल. यावर मंत्री सामंत यानी घाईघाईत कोणताही निर्णय न घेता पुरेपुर तपासणी करून रविवारी सायंकाळी प्रथम लहान हलकी वाहने सोडावीत. नंतर पुढील निर्णय घ्यावा, असे सांगितले.
नवीन पुलाच्या सथ्ंागतीबाबत दंड आकारणार
दरम्यान नवीन पुलाच्या कामाबाबत विचारणा केल्यानंर दोन्ही ऍप्रोच रोडचा भराव सुरू आहे. मात्र माती मिळत नसल्याचे कंत्राटदार कंपनीकडून सांगण्यात आले. यावेळी नदीतील गाळ काढून तो भरावासाठी घेण्यास परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत तारखाच मिळत असल्याने आता दंड आकारणी सुरू करणार आहोत. त्यासाठी कंपनीच्या जबाबदार अधिकाऱयाना तातडीने बोलावून घ्यावे, अशा सूचना स्थानिक व्यवस्थापनाला करण्यात आल्या.