सरत्या 2020 या वर्षात मानवी आरोग्य आणि आरोग्य व्यवस्था आणि दुसऱया बाजूला सतत बदलणारा विषाणू असे चित्र आहे. हे चित्र येणाऱया वर्षातही सुरु राहील यात शंका नाही. मात्र सरत्या वर्षाने प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्राथमिक धडे गिरविण्यास भाग पाडले.
सरत्या 2020 वर्षाप्रमाणे वर्ष आयुष्यात कधीही येऊ नये असे सर्वांना वाटत असले तरीही या वर्षाने प्रत्येकवेळी ओरड होणाऱया आरोग्य क्षेत्रातील समस्या सार्वजनिक केल्या. कोरोना विषाणूचे थैमान देशातील महाराष्ट्रात अधिक होते. त्यात मुंबई शहरात सर्वाधिक आहे. आजही दैनंदिन आकडेवारी समोर येताना ’अजून शिल्लक आहेच का?’ असा प्रश्न पडतो. असा प्रश्न पडण्यास कारण कि, कोरोना विषाणूचे बदलणारे रूपसुद्धा समोर येत आहे. तरीही या स्थितीत नवीन विषाणू, आरोग्य क्षेत्रातील साधनामधील उणीव सांभाळून हा विषाणू नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. महामारीच्या काळात मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि धारावीसारख्या संसर्गित भागांचा धसका प्रत्येक मुंबईकरांनी घेतला होता. मात्र सरत्या वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ात या भागातून बाधित रुग्णांची संख्या शून्यावर येताना पाहून जीव भांडय़ात पडत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या भागांनी चिंतेचे ढग पसरविण्यास सुरुवात केली होते. मात्र दिवाळीनंतरच्या काळात यातून कमी होत जाणारी रुग्णसंख्या बघून मुंबई सुटकेचा श्वास घेत होते. शहरात अशी स्थिती असताना उपनगरातील के पश्चिम आणि के पूर्व भागातही संसर्ग चिंता वाढवत होता. तर आर सेंट्रल व एल वॉर्डमधील दाट लोकसंख्या संसर्ग कितपत गंभीर करेल अशी चिंताही पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची झोप उडवत होती. देवनार, भांडुपमधील झोपडय़ादेखील रुग्णालयांच्या कोरोना वॉर्डात आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होत होत्या. वस्त्यांमधील हा सर्व लेखाजोखा पालिका घेत होती. त्याचवेळी रुग्णालये आणि कोव्हीड सेंटर खुली ठेवण्यात येत होती. चाचण्या आणि पर्यायी उपचारांमधील आधुनिक बदल तज्ञ वारंवार सुचवत होते. असे असतानाही विषाणूची वाढती आकडेवारी सर्वांचीच परीक्षा घेणारी ठरत होती. कोरोनासारख्या महामारीशी झुंजताना रुग्णालये प्रशासनातून वेगळीच लढाई सुरु होती. रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णसेवा करणारे अल्प मनुष्यबळ, कित्येक पदे वर्षानुवर्षे भरली नसल्याने परराज्यातून मागविण्यात आलेले वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ यातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील त्रुटी सार्वजनिक झाल्या. यावर भलेही आरोग्य मंत्र्यांनी रिक्त जागा भरून काढण्याचे आदेश दिले, मात्र तो पर्यंत अल्प मनुष्यबळाचा वापर करून गेली कित्येक वर्षे चालढकल केली जात असल्याचे याच वर्षात समजले. मनुष्यबळासोबत पीपीई किट, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, रुग्णांना लागणारे व्हेंटिलेटर, तपासणीच्या प्रयोगशाळा, प्राणवायू आदी क्षेत्रातील गोंधळ याच कोरोनाने समोर आणला. पीपीई किटसारखा वेष डॉक्टर रुग्णसेवा करताना वापरत असतात हे सर्वसामान्यांना नव्याने समजले. यातही शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणारे पीपीई किट, इतर कर्मचारी वापरत असणारे किट असे विविध प्रकार याच कोरोनाने दाखवून दिले. तर मास्कसारख्या साधनात हि वन लेयर, टू लेयर, थ्री लेयर या सह एन95 नावाचा मास्कदेखील असून डॉक्टरच याचा वापर करतात हेही या महामारीने शिकवले. अन्यथा महामारी संसर्ग वाढू लागल्यावर प्रत्येकाने एन95 मास्कचा हट्ट धरून उगीचच या मास्कच्या काळाबाजारीला हातभार लावला. हे देखील कोरोनाच्या भितीतूनच स्पष्ट केले. सार्वजनिक ठिकाणी हात तोंड झाकले जाईल असा रुमालदेखील पुरेसा असल्याचे आरोग्य मंत्री वारंवार सांगूनही काही लोक एन95 मास्कचा हट्ट करताना दिसत होते.
महामारीच्या धुमश्चक्रीत खासगी पंचतारांकित हॉस्पिटलच्या तोडीस तोड सार्वजनिक सरकारी रुग्णालयेदेखील चांगली सेवा देत असल्याचे समोर आले. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये गर्भश्रीमंत आणि मध्यमवर्गीय असा कोणताही भेद दिसून येत नव्हता. कित्येक रुग्णांनी सरकारने उघडलेल्या कोव्हीड सेंटरवर विश्वास व्यक्त करत त्यात दाखल होण्यासाठी इच्छा व्यक्त केली. दरम्यान खासगी रुग्णालयांनी वारेमाप फी आकारून आर्थिक लूट केल्याचेदेखील सर्वज्ञात झाले. खासगी रुग्णालये, चाचणी केंद्र, विशिष्ट मास्कसारख्या घटकांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले जात होते. त्यावर सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखून ठेवण्यास भाग पाडले. तर मास्कचे दर समितीकडून ठरवून सर्वसामान्यांना दिलासा दिला. व्हेंटिलेटरसारख्या साधनांचा पुरवठा करण्यासाठी संस्था आणि व्यक्ती समोर आल्या. या महामारीने स्थितीचा गैरफायदा घेत आर्थिक लूट करणारे आणि कठीण प्रसंगात सर्वस्व पणाला लावून मदत करणारे अशी समाजातील दोन्ही रूपे समोर आणली. याच वर्षात पॅथीतील संघर्ष देखील दिसून आला. कोरोनाबाधित रुग्णांवर ऍलोपॅथी, होमिओपॅथी तसेच आयुर्वेदिक अशा तिन्ही पॅथी उपचार करताना दिसून येत आहेत. यात ऍलोपॅथीचा वरचष्मा दिसून आला असला तरीही इतर पॅथीच्या उपचाराचे फायदे रुग्ण घेताना दिसून आले. शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे कोरोना विषाणूच्या विरोधातील लस रशिया, अमेरिका आणि ब्रिटन या तीन देशांनी संशोधित केली आहे. असे असले तरी भारतही यात मागे नसून ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस सिरमच्या माध्यमातून भारतात येत आहे. 2020 या वर्षात कोरोना विषाणूने वेठीस धरले. आरोग्य महत्वाचे असल्याचा संदेश दिला. एकत्रित लढला जाणारा लढा जिंकला जाऊ शकतो, हेही 2020 या वर्षाने दाखवून दिले.
सरकारी यंत्रणेने तत्पर आणि कालानुरूप बदल करून सार्वजनिक आरोग्य सेवेला बळकट करणे आवश्यक आहे. तर नागरिकांनी स्व-स्वच्छते सह परिसरातील स्वच्छता राखणे महत्वाची आहे. यात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे.
राम खांदारे