समर्थांनी दासबोधात नऊ प्रकारच्या भक्तींचे वर्णन केले आहे. त्यात श्रवणभक्ती, कीर्तनभक्ती, नामस्मरणभक्ती, पादसेवन भक्ती, अर्चनभक्ती, वंदनभक्ती, दास्यभक्ती, सख्यभक्ती, आत्मनिवेदनभक्ती यांचा समावेश होतो. या नऊ प्रकारांच्या भक्तीच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती होऊ शकते.
नवविधा भक्ती या दासबोधातील चौथ्या दशकात सुद्धा व्यवस्थापकीय सूत्र म्हणजेच ‘मॅनेजमेंट प्रिंसिपल्स’ आहेत. व्यवस्थापनशास्त्रात कोणीही सदासर्वकाळ पारंगत असेल, परिपूर्ण असेलच असे होत नाही. जसा जसा काळ पुढे जातो, त्याप्रमाणे समाजात आणि माणसाच्या प्रवृत्तीत बदल होत राहतात. समाजासोबत आणि काळाप्रमाणे जे स्वतःमध्ये बदल घडवतात तेच काळानुरूप टिकतात. परंतु जे काळाप्रमाणे बदलत नाहीत त्यांची नोंद काळ, वेळ आणि समाज घेत नाही. पुढे जाऊन ते सर्व काही कालबाहय़ होते आणि विस्मरणात जाते. म्हणूनच ‘कालाय तस्मै नमः।’ असे म्हटले आहे.
समर्थांनी याच काळाचा महिमा ओळखून मनुष्यप्राण्याला त्याचे अंतिम ध्येय गाठून देण्याकरिताच दासबोधातील नवविधा भक्तींचा मार्ग दाखवला आहे. नवविधा भक्तीतील कीर्तनभक्तीद्वारे व्यवस्थापनशास्त्रातील बऱयाचशा सूत्रांचा अभ्यास आपल्याला करता येतो. कीर्तन हे भगवंताला अतिशय प्रिय असल्याने या नवविधा भक्तीतील प्रकाराला भगवंतानेपण मान्यता दिली आहे. कीर्तनात आपण दंग होतो, वक्ता आणि श्रोता स्वतःचे देहभान विसरतात आणि भगवद्भक्तीत लीन होतात म्हणून समर्थ म्हणतात की,
करुणाकीर्तनाच्या लोटे ।
कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांची श्रवणपुटें ।
आनंदे भरावी ।।
कंप रोगांच स्फुराणे ।
प्रेमाश्रुसहित गाणे
देवद्वारी लोटांगणे ।
नमस्कार घालावे ।।
12-13-02-04.
म्हणजे, कथा सांगताना करुणरसाचा लोट वाहिल अशी धडाकून कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावे. कथा सांगताना सात्त्विक भावाने मन भरून जावे, शरीर कंप पावावे, अंगावर शहारे येणे, प्रेमाश्रू यावे आणि देवासमोर लोटांगण करून नमस्कार करावा.
या ओव्यांमध्ये ठिकठिकाणी व्यवस्थापन शास्त्र डोकावते, ते असे की, जेव्हा एखादी संस्था, कंपनी किंवा उद्योगसमूह निर्माण होत असतो त्यावेळी त्या संस्था चालकाने, कंपनीच्या मालकाने किंवा उद्योगसमूहाच्या संचालक मंडळाने स्वतःच्या आस्थापनेविषयी, स्वतःच्या उत्पादनाविषययी जागतिक स्तरावर किंवा जागतिक बाजारपेठेत भरभरून जाहिरात करावी. संपूर्ण ग्राहकवर्गाचे लक्ष आपल्याकडे वळवावे, त्यांना आपले महत्त्व पटवून द्यावे. समाजाच्या मुळापर्यंत आपल्या कार्याचा विस्तार करावा. कुठेही न थकता सतत कार्यरत रहावे. आपल्या संस्थेचा विश्वास समाजात निर्माण करताना सतत उत्साही असावे. आपला ग्राहक हाच आपला देव आहे, आपला ग्राहक हाच आपला राजा आहे या सात्त्विक भावनेने त्याची सेवा करावी आणि त्याच्याशी एकरूप व्हावे तरच संबंधित उद्योगसमूह हे व्यवस्थापनशास्त्रात यशस्वी होऊ शकेल.
व्यवस्थापन प्रक्रियेची परिणामकारकता ही बऱयाच अंशी व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. ‘कार्यक्षम व्यवस्थापक हे जन्मतःच असतात किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये मुळात व्यवस्थापकीय कार्यक्षमता असते’ हा खूप मोठा भ्रम आहे. व्यवस्थापनाचे कार्य हे ते काम करणाऱया व्यक्तीशी आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे हे जेवढे आवश्यक आहे, त्यापेक्षा अधिक उपक्रमाच्या पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. व्यवस्थापकाची कार्यक्षमता ही अनेक गोष्टींवर आधारित असते. व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यालाच ‘व्यवस्थापन विकास’ असे म्हणतात.
व्यक्ती त्यांचे कार्य करीत असतानाच शिकत असतात. परंतु काम करीत असताना व्यक्ती अनेकवेळा चुका करत असतात. अशावेळी काम करणाऱया व्यक्तींना त्यांच्या कार्यासंबंधी सैद्धांतिक माहिती सांगणे आणि कार्यपद्धती समजावून देणे, तज्ञाकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळवणे, साहाय्य करणे आणि अडचणींचे निराकरण करणे, या उपायांचा अवलंब केल्यास व्यवस्थापन विकासाची प्रक्रिया सुलभ आणि परिणामकारक होते.
प्रशिक्षणामुळे किंवा अध्यापनामुळे व्यवस्थापकांना प्रशिक्षित केले जाते. त्यामुळे व्यवस्थापक त्यांचे काम करू लागल्यावर त्यांना नवखेपणा जाणवत नाही. त्यांच्यातील बुजरेपणा निघून जातो. त्यांना कार्यपद्धती आणि साधनांचा सराव होतो.
व्यवस्थापक त्यांचे काम करीत असताना त्यामध्ये व्यक्तिगत प्रशिक्षणाचे तंत्र खूप लोकप्रिय आहे. या तंत्रानुसार व्यवस्थापकाने कसे काम करावे हे त्यांच्या अधिकाऱयांकडून त्यांना कळते. काम करीत असताना काही अडचणी जाणवल्यास, अधिकाऱयांचा सल्ला घेऊन अडचणींचे निराकरण करवून घेणे आणि काम संपल्यानंतर कामाचे संपूर्ण अहवाल अधिकाऱयांना सादर करून त्यांचा त्यावर अभिप्राय घेतला जातो. व्यवस्थापन विकास किंवा व्यवस्थापकीय विकास याविषयी समर्थांनी अतिशय सूचक शब्दात कीर्तनभक्ती समासात असे म्हटले आहे की,
सगुणकथा या नाव कीर्तन ।
अद्वैत म्हणजे निरुपण ।
सगुण रक्षून निर्गूण । बोलत जावे ।।
असो वक्तृत्वाचा अधिकार ।
अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार ।
अनुभवाचा ।। 23-24-02-04
म्हणजे, भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव असल्याने अद्वैताचे निरुपण म्हणजेच त्याचे विवेचन आणि प्रतिपादन होय. हरिदासाने सगुणाचे महत्त्व सांभाळून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. जो मनुष्य अनुभवाने, ज्ञानाने अल्प आहे अशाला वक्तृत्वाचा अधिकार नसतो. वक्ता हा अनुभवसंपन्न व ज्ञानसंपन्नच असावा. व्यवस्थापनाच्या दृष्टीने जो अधिकारीवर्ग अतिशय उच्च व्यवस्थापनात कार्यरत आहे, त्याने आपल्यासह काम करणाऱयांना कामाचे स्वरूप नीट समजावून सांगावे. आपल्या उद्योगसमूहाचे हित सांभाळूनच इतर व्यवस्थापकांना सांभाळून घ्यावे, अनुभवाने शहाणे व्हावे आणि आपल्याजवळील असलेला ज्ञानाचा साठा व्यवस्थापकांना द्यावा.
माधव किल्लेदार