प्रतिनिधी / गारगोटी
वाघापूरसह व्हनगुती, श्रीनगर, मुदाळ शिवारात चार गव्यांनी धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले. अचानक गव्यांचा कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले असुन वनविभागाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
आज पहाटे ऊस तोडणी मजूर, शेतकऱ्यांना व्हनगुती येथील सतिश चौगले यांच्या मक्याच्या रानात गव्याचा कळप मक्क्याची नासधूस करताना दिसला त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु गव्यानी त्यांना दाद दिली नाही. चार गावे वाघापूर परिसरात दाखल झाल्याचे समजताच लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे बिथरलेले गावे सैरावैरा पळू लागले. व्हनगुतीच्या सरपंच मधुरा ख॔टागळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, अरूण पाटील यांनी लोकांना दक्षता घेण्यास सांगितले पण हुल्लडबाज शेतकरी गव्याना घाबरवत होते.
सकाळी साडेनऊ वाजता गव्यांनी मुदाळ डोंगराच्या दिशेने धुम ठोकली गव्यानी ऊस लावणीचे तसेच मका ,भुईमूग पिकांचे अंतोनात नुकसान केले याचा पंचनामा करून शासनाने त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुनिल खंटागळे यांनी केली आहे.