वार्ताहर / खोची
संघर्षातून शरद साखर कारखाना उभा राहून आज तो राज्यात चांगला दर देणारा कारखाना म्हणून उदयास आला आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी पुढील हंगामाच्या प्रारंभी कारखानाची गाळप विस्तार क्षमता दहा हजार करून ५९ कोटी ६७ लाख रूपये खर्चाचा ३० हजार लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प कार्यरत करून इथेनॉलचे उत्पादन व सहवीज प्रकल्पाच्या माध्यमातून २८ मेगावॉट वीज निर्मिती सुरु करणार आहे. यासाठी ऊस उत्पादक सभासद,शेतकरी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
ते नंरदे ता. हातकणंगले येथील शरद साखर कारखान्याची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सामाजिक अंतर राखत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्हा.चेअरमन थबा कांबळे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने,दशरथ काळे,संचालक संजय पाटील यड्रावकर,रावसाहेब भिलवडे, आप्पासो चौगुले,संजय बोरगावे, रविकांत कारदगे,गुंडा इरकर,लक्ष्मण चौगुले,आण्णासो सुतार आदी उपस्थित होते.प्रारंभी सहकारमहर्षी शामराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सभासदांचे स्वागत संचालक डी.बी.पिष्टे यांनी स्वागत केले.यावेळी शहीद जवान,दिंवगत सभासद,ऊस उत्पादक,सभासद,कर्मचारी व प्रतिष्ठित मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.वार्षिक सभेचे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.आवटी यांनी केले. यावेळी सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात हात उंचावून मंजूर केले.
यड्रावकर पुढे म्हणाले,साखर उधोग अडचणीत असून साखरेचा हमीभाव आणि उसाचा प्रतिटन दर यांचा मेळ बसत नाही. साखरेच्या निर्यात अनुदानाची पंधरा कोटी रक्कम प्रलंबित आहे. साखरेचा बफर स्टॉक बाबत केंद्राचे धोरण अनिश्चित आहे. साखरेचा हमीभाव ३४०० रुपये करणे गरजेचे आहे.तो तीन हजार च्या दरम्यान आहे.त्यामुळे एकरकमी एफ.आर.पी.देणे शक्य नाही.तरीसुद्धा उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून उत्पादन खर्चात कमी करून एकरकमी एफ.आर.पी,कामगार,तोडणी-वाहतूक यांची देणी दिली आहेत. शेतकऱ्यांनी हि कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे.
यावेळी आसाम रायफल्स येथे असि.कमांडट पदी नियुक्ती झाल्याबद्दल महादेव कुंभार (नांदणी),चार्टर्ड अकाऊंट दिलीप फडणवीस,मोटर स्पोर्टमन जिनेंद्र सांगावे,कोरोना योध्दा डॉ.अनिल चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संजय नांदणे, अजित उपाध्ये आदि. मान्यवर यावेळी उपस्थित होते.