एकही मात्र उपलब्ध न झाल्याने धावपळ,
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाशी लढा देताना जीवरक्षक औषध म्हणून देण्यात येणारे इंजेक्शन ‘रेमडेसीवीर’ची जिल्हा रूग्णालयात टंचाई असून एकही मात्रा अद्याप उपलब्ध झालेली नाही. रविवारी एका रूग्णासाठी या इंजेक्शनची आवश्यकता भासल्याने कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गपर्यंत धावपळ करावी लागली. दोन ठिकाणी खास गाडय़ा पाठवून इंजेक्शनची व्यवस्था करण्यात आली.
कोरोना रोगाशी लढा देणाऱया काही रूग्णांची परिस्थिती गंभीर होते अशा रूग्णांना नवीन संशोधित औषध द्यावे लागते. ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन त्यासाठी देण्यात येते. देशभरात 10 हजार इंजेक्शन त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तथापि अद्याप रत्नागिरीत हे इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही.
शासकीय रूग्णालयात उपचार घेणाऱया एका रूग्णाची परिस्थिती रविवारी गंभीर बनली. डॉक्टरांनी रेमडेसीवीर हे इंजेक्शन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. शासकीय रूग्णालयात ते उपलब्ध नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात खास गाडय़ा पाठवल्या आणि इंजेक्शन मागवून घेतले. रूग्णाला हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
कोरोनाविरोधातील लढय़ासाठी सुसज्ज असल्याचा दावा करणाऱया प्रशासनाची धावपळीमुळे पोलखोल झाली. या इंजेक्शनची एकही मात्रा शासकीय रूग्णालयात उपलब्ध न झाल्याने धावपळ करावी लागली. रूग्णाचे नातेवाईक धावपळ करण्यासाठी तत्पर असल्याने काही वेळात हे इंजेक्शन मिळाले. परंतु सरकारी पातळीवर मात्र पूर्वयोजनेची तत्परता दिसली नाही. हीच वेळ एखाद्या गरीब रूग्णावर आली असती तर त्याच्या आयुष्यालाही धोका निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे आवश्यक औषधोपचार तत्काळ उपलब्ध व्हावेत अशी मागणी होत आहे.
दरम्यान, कोरोनाविरोधात लढणाऱया आरोग्य कर्मचाऱयांनाही पुरेशा सुरक्षा सुविधा पुरवण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी बाधीत होत असल्याचे सांगितले जात आहे.