सतीश सावंत यांची कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी
कणकवली:
सिंधुदुर्ग हा कृषीप्रधान व पर्यटन जिल्हा आहे. मात्र, जिल्हय़ातील शेतकऱयांना शेतीविषयक अडचणींना मोठय़ा प्रमाणात सामोरे जावे लागते. या शेतकऱयांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्गातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे. भातशेती, आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांसाठी प्रामुख्याने सिंधुदुर्ग ओळखला जातो. शेतकरी आता आधुनिक साधनांचा वापर करून शेती करतो. येथील शेतकरी घेतलेली कर्जे मुदतीत भरण्याकडे जातीने लक्ष देतो. परिणामी शासनाच्या विविध कर्जमाफी योजनांचा अत्यल्प लाभ या जिल्हय़ाला झाला आहे.
शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये शेतकऱयाने ऑनलाईन मागणीअर्ज भरणे आवश्यक आहे. मात्र, सिंधुदुर्गात भौगोलिक कारणास्तव मोबाईल इंटरनेटचा मोठा अडथळा असल्याने शेतकऱयांना ऑफलाईन अर्ज भरण्याची मान्यता मिळावी. जिल्हय़ात शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत 7 हजार अर्ज प्राप्त झाले असून 471 शेतकऱयांसाठीची लॉटरी निघाली आहे. योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱयांना लाभ मिळण्यासाठी हे लक्ष्य वाढवावे. एमआरईजीएस फळबाग लागवड योजनेखाली प्रति लाभार्थी 2 हेक्टर क्षेत्राची असलेली मर्यादा 10 हेक्टरपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हय़ातील पडिक जमिनीवर बांबू लागवड केल्याने शेतकऱयांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यासाठी चांगल्या बांबू रोपांची आवश्यकता असून तसे संशोधन व्हावे. कातळावरील आंबा लागवडीसाठी स्वतंत्र योजना कार्यान्वीत करावी. शॉर्टसर्किट अथवा वणव्यामुळे मेलेल्या झाडांबाबत भूसंपादन करताना झाडांच्या करीत असलेल्या मूल्यांकनाप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करावा. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव इन्शूरन्स कंपनीकडून तातडीने मंजूर होऊन मिळावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
काजूला योग्य हमीभाव मिळत नसल्याने गोरगरीब शेतकऱयाला मोठे नुकसान सोसावे लागते. काजू बीचे मानांकन करण्यासाठी येणाऱया खर्चास शासनाकडून शेतकऱयाला मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. बंद असलेला आंबा-काजू बोर्ड पुनरुज्जीवित करावा व त्याचे कार्यालय सिंधुदुर्गात सुरू करावे, अशा विविध मागण्या सावंत यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्या आहेत.