आ. शिवेंद्रसिंहराजे; वाढीव सातारा एमआयडीसीबाबतच्या बैठकीत मागणी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा वाढीव एमआयडीसीसाठी टप्पा क्र. 3 व 4 मधील देगांव, निगडी आणि वर्णे याठिकाणी योग्य दर मिळाला तर शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार होतील. रोजगार निर्मीती, भुमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी आणि सातारा तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने वाढीव एमआयडीसी होणे काळाची गरज आहे. याठिकाणी 11 लाख रुपये हेक्टरी एवढा उच्चतम दर आहे आणि नवीन कायद्यानुसार चारपट म्हणजेच 44 लाख रुपये हेक्टरी दर शेतकऱयांना मिळू शकतो. असे असले तरी तडजोडीअंती शेतकऱयांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
सातारा वाढीव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 3 (देगांव) आणि टप्पा क्र. 4 (निगडी-वर्णे) भूसंपादनाबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱयांना तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी भूसंपादन आणि शेतकऱयांना मिळणारा दर याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रभाकर घार्गे, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, भूमापक खापरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
देगांव, निगडी, वर्णे वाढीव एमआयडीसी मंजूर असून तसे शिक्केही जमीनीवर पडले आहेत. रोजगारनिर्मीतीसाठी ही एमआयडीसी लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. भूमीपुत्रांना नोकऱया मिळतील आणि शेतकऱयांच्या जमिनीला पैसेही मिळतील. त्यासाठी भुसंपादन तातडीने झाले पाहिजे. रास्त भाव मिळाला तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. भुसंपादन करताना बागायती क्षेत्र, तसेच घरबांधणीसाठी झालेले प्लॉटींग, नागरी वस्ती आणि देगांव पाझर तलाव वगळून डोंगरालगतची पडीक, माळरान, नापीक जमीन संपादन करावी, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली. तसेच प्रती हेक्टरी 11 लाख रुपये हा उच्चतम दर आहे. 2013 च्या सुधारित कायद्यानुसार या उच्चतम दराच्या चौपट म्हणजेच 44 लाख रुपये प्रती हेक्टर दर होणार आहे. असे असले शेतकरी आणि शासन यांच्यात तडजोड होवून शेतकऱयांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळाला पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
शेतकऱयांना चांगला दर मिळावा याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करु. शेतकऱयांनीही भूसंपादनासाठी सहकार्य केले पाहिजे. चांगला दर मिळत असेल तर विरोध करु नये आणि आपल्याच मुलाबाळांना हक्काची नोकरी मिळण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी केले. बैठकीअंती जिल्हाधिकारी सिंह यांनी तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱयांना सूचना केल्या. तसेच पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.