ऑनलाईन टीम / ओडिशा :
पूर्व लडाखमधील सीमारेषेवर असलेल्या भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी शौर्य क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती यशस्वीरित्या प्रक्षेपित केली. हे क्षेपणास्त्र पृष्ठभागावरून पृष्ठभागावर हल्ला करणारे आण्विक क्षमतेने सज्ज असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
ओडिशातील बालासोर येथील किनारपट्टीवर या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून शत्रूला800 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्य केले जाऊ शकते. शौर्य क्षेपणास्त्राच्या आगमनामुळे विद्यमान मिसाईल प्रणाली मजबूत होईल.
दरम्यान, भारताने बुधवारी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ज्यामुळे 400 किलोमीटरहून अधिक अंतराचे लक्ष्य नष्ट होऊ शकते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) ओडिशातील बालासोर येथील जमिनीवरून पीजे-10 प्रकल्पांतर्गत या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. स्वदेशी बूस्टरने हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते.