प्रतिनिधी/ काणकोण
श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाचे 24 वे मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या गुरूपीठारोहणानंतरच्या पहिल्या चतुर्मास व्रताला 31 पासून पर्तगाळी मठात प्रारंभ झाला आहे. त्यापूर्वी व्यासपूजा झाल्यानंतर मठ समितीच्या वतीने अध्यक्ष श्रीनिवास धेंपे आणि उपाध्यक्ष आर. आर. कामत यांनी स्वामी महाराजांची पाद्यपूजा केली आणि दक्षिणा दिली. त्यानंतर झालेल्या धर्मसभेतील आशीर्वचनात प. पू. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी गुरूस्वामींचे स्मरण करून चतुर्मासाचे महत्त्व विषद केले.
चतुर्मास हा सर्व वर्णांसाठी बंधनकारक आहे. मात्र कलियुगात केवळ स्वामी महाराजांनीच चतुर्मास करायला हवा असा असलेला संकेत बरोबर नव्हे. पावसाळय़ाचे दिवस असल्यामुळे या कालावधीत अहिंसा तत्त्वाचे पालन करतानाच सात्विक आहार घ्यायला हवा. या कालावधीत मांसाहार निषिद्ध असून पशू, पक्ष्यांची हत्त्या करू नये, असे स्वामी महाराज म्हणाले. बेळगावी ज्यावेळी चतुर्मास झाला त्यावेळी आपण गुरूस्वामींची निस्सीम सेवा केली आणि त्याचे फळ म्हणून आपण आज पीठाधीश झालेलो आहे. म्हणून निरपेक्ष भावनेने गुरूभक्ती आणि गुरूसेवा करायला हवी, असे श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी पुढे सांगितले.
गुरूस्वामींचे सर्व संकल्प प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न आपण करणार आहे. बारा दिवस अगोदर आपण हा दिवस येईल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. गुरूस्वामी आणि आपण मिळून 55 वे चतुर्मास व्रताचरण एकत्रितपणे करणार होते. परंतु दुर्दैवाने ते घडू शकले नाही. आपण एक दिवस केलेल्या कामाचे गुणगान अनुयायी करतात. त्याचवेळी मागच्या 47 वर्षांत गुरूस्वामींनी जे कार्य केले त्याची तुलनाच करता येत नाही. आपले भाग्य म्हणून असे गुरूस्वामी आपल्याला भेटले, असे प. पू. स्वामी महाराज यावेळी म्हणाले.
मागच्या दोन दिवसांत जे भक्तगण आणि अनुयायी विविध भागांतून आलेले आहेत त्यानी आपल्या घरी गेल्यानंतर किमान पाच दिवस तरी घरीच विलीगकरणात राहावे. चुकून एखाद्याला ताप आल्यास वा सर्दी झाल्यास त्वरित डॉक्टरी उपचार घ्यावेत, असा सल्ला स्वामी महाराजांनी यावेळी सर्वांनाच दिला.
श्रीनिवास धेंपे
विद्यमान स्वामी महाराजांमध्ये असलेले सर्व गुण गुरूस्वामींच्या गुणांशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे विद्यमान स्वामी महाराज जे जे संकल्प करतील ते तडीस निश्चित जातील. गुरूस्वामींनी एक बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती स्वामी महाराजांच्या रूपाने दिली आहे. स्वामी महाराज सरस्वतीचे पुत्र असून मठ परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. त्यांच्या सर्व गोष्टींना सहकार्य करण्याची गरज आहे. चतुर्मास हा विश्रांतीचा मास, या काळात व्रत पाळून विश्रांती घेण्याची संधी द्यायला हवी, असे मत धेंपे यांनी स्वागतपर भाषणात व्यक्त केले. गुरूपीठारोहणानंतरचा पहिला चतुर्मास हा ऐतिहासिक क्षण असून सारस्वत समाजाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, असे धेंपे पुढे म्हणाले.
या सोहळय़ाला मठ समितीचे संजय पै रायतूरकर, डॉ. राजन कुंकळय़ेकर, पुत्तू पै आणि विविध भागांतून आलेले मठाचे अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळयाचे सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. तत्पूर्वी स्वामी महाराजांनी ब्राह्मण दीक्षा दिली आणि उपस्थित सर्वांना फल-मंत्राक्षता प्रदान केल्या. या चतुर्मास प्रारंभाच्या वेळी प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, युरी आलेमाव, सरचिटणीस जनार्दन भंडारी, दया पागी, प्रलय भगत, विशाल पै काकोडे, नवदीप फळदेसाई, दीपक पागी आणि अन्य कार्यकर्त्यांनी स्वामी महाराजांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.