कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
गेल्या काही दिवसांतील दमट हवामान, दोन दिवस सुरू असलेली संततधार, त्यातून वाढलेला गारठा अशा दुषित वातावरणात कोरोनाचा विषाणू अधिक सक्रीय होण्याचा धोका आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा रोज 500 वर जाण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा सर्वाधिक धोका व्याधीग्रस्त आणि ज्येष्ठांना आहे. कोरोनाने 220 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर व्याधीग्रस्त, ज्येष्ठांवरील उपचाराला प्राधान्य देण्याचे आव्हान आहे.
जिल्हय़ात कोरोनाने बळी गेलेल्या 140 मृत्यूपैकी 87 मृत्यू अन्य विकारांमुळे गेल्याचे अन् ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे नमूद केले आहे. मधुमेह, रक्तदाब, दमा, किडनी विकारात कोरोना संसर्ग झाल्यास त्यांच्या जीवाला अधिक धोका आहे. सध्या रिमझिम पाऊस, संततधार, वाढलेला गारठा, कोंदट हवामानामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सध्या कमी झाला आहे. सप्ताहभरात वाढता उष्मा, त्यानंतर रिमझिम, संततधारेमुळे गारठय़ात वाढ झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ, व्याधीग्रस्तांना औषधोपचाराची गरज आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 8 हजारांवर आहे. कोरोना बळींची संख्या दोनशेवर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात 70, नगरपालिका क्षेत्रात 73, महापालिका क्षेत्रात 50 तर अन्य जिल्हय़ातील 10 जण आहेत. जिल्हय़ात करवीर तालुक्यात 21, हातकणंगलेत 19 तर शिरोळ 7, गडहिंग्लज 6, पन्हाळा 4, चंदगड 4, आजरा 3, भुदरगड, शाहूवाडी प्रत्येकी 2 आणि गगनबावडा, कागल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रात इचलकरंजी पालिका हद्दीत सर्वाधिक 59 जणांचा कोरोनाने बळी घेतला. इतर पालिकांत हुपरी 6, जयसिंगपूर 3, कुरूंदवाड 2, कागल 2 आणि शिरोळमधील एक बळी आहे. अन्य बळींत कर्नाटक, रत्नागिरीतील प्रत्येकी 4, सांगलीतील 2 आहेत.
जिल्हय़ातील 140 कोरोना बळींचा ‘सीपीआर’मधील तज्ञ समितीने अभ्यास केला. त्यातून 87 कोरोना बळी अन्य विकारांमुळे झाले. कोरोना बळींमध्ये अधिकतर नोंद न्यूमोनियाने झाल्याचे नमूद आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह असताना दमा, रक्तदाब, मधुमेह, श्वसन, किडनीविकार आदी बळावल्याने अन् ते अंतीम टप्प्यात उपचारार्थ आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच अशा व्याधीग्रस्तांना प्राधान्याने औषधोपचाराच्या सुचना त्यांनी केल्या आहेत.
व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवली, खासगी हॉस्पिटल्समध्ये बेड राखीव
सातत्याने बदलणारे वातावरण, दोन दिवसांत पाऊस अन् दमट, गारठय़ामुळे पुन्हा सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णांत वाढ झाली आहे. सर्दी, तापासह आता अंगदुखी, डोकेदुखीचे रूग्ण वाढले आहेत. त्यातून कोरोना इन्फेक्शनचा धोकाही आहे. वाढला आहे. या काळात व्याधीग्रस्त, ज्येष्ठांना कोरोना संसर्गापासून जपण्याचे आव्हान आहे. त्यादृष्टीने सीपीआरसह आयजीएम, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयांत व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये काही बेड राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हय़ात सत्तरी ओलांडलेले 300 पॉझिटिव्ह रूग्ण
जिल्हय़ात सद्यस्थितीत 7 हजार पॉझिटिव्ह रूग्णांत 21 ते 50 वयोगटात सर्वाधिक 4 हजार पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. 51 ते 70 वयोगटातील 1 हजार 565 रूग्ण आहेत. सत्तरी ओलांडलेले 291 पॉझिटिव्ह रूग्ण असून त्यातील काही हायरिस्कमध्ये असून व्याधीग्रस्त असल्याची माहिती आरोग्य विभागाने आली.