भारतीय संगीत सृष्टीच्या सुवर्णयुगाचा वारसा केला वैभवशाली : देशाला एकत्र बांधून ठेवण्यामध्ये लतादीदींचा स्वरही महत्त्वाचा : संगीत क्षेत्रात त्या प्रत्येकाचेच रोलमॉडेल
प्रतिनिधी /बेळगाव
भारताचे वैभव असणाऱया आणि केवळ भारतीय रसिकांवरच नव्हे तर जगभरातील रसिकांवर आपल्या गायनाची ठसठशीत अशी नाममुद्रा उमटवून लता मंगेशकर यांनी आपला निरोप घेतला आणि घरातीलच एक वडीलधारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त झाली. बेळगाव आणि धारवाडमधल्या गायकांनीसुद्धा लतादीदींबद्दल आपल्या भावना उत्कटपणे व्यक्त केल्या.
स्वरांमधून त्यांचे अस्तित्व चिरंतन राहणार
अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगणाऱया लता मंगेशकर यांनी गायनाबाबतही कमालीची शिस्त बाळगली. त्याच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. संगीत क्षेत्रात त्या प्रत्येकाचेच रोलमॉडेल होत्या. परंतु, भारतीय संस्कृतीचे जतन करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. हृदयनाथ मंगेशकर गदगला आल्यावेळी पंचाक्षरी गवई यांनी त्यांना आशीर्वाद दिला होता. लता मंगेशकर यांच्या बाबतीत कोणाला फारशी माहिती नाही, अशी एक आठवण आहे. ती म्हणजे, दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी त्यांनी मल्लिकार्जुन मन्सूर यांना गायनासाठी बोलावले. ही मैफल झाल्यानंतर लतादीदी स्वतः मन्सूर यांच्याकडे गेल्या आणि त्यांच्यासमोर कोरा धनादेश ठेवून त्यावर तुम्ही रक्कम लिहा, असे त्यांनी सांगितले होते. एका मोठय़ा गायक कलाकाराचा सन्मान आणि त्याची कुवत लतादीदी पूर्णपणे ओळखून होत्या, हेच आपल्याला यावरून कळते. संगीताचा अभ्यास ही अत्यंत कष्टसाध्य गोष्ट आहे. त्याचे उत्तम उदाहरण लता मंगेशकर होत्याच, त्याचवेळी संस्कृती, संस्कार आणि संगीत या तिन्हींची जपणूक करणाऱया त्या सरस्वती देवीच होत्या. त्यांच्या स्वरांमधून त्यांचे अस्तित्व चिरंतन राहणारच आहे.
– गायक वेंकटेश कुमार, (कालिदास सन्मान पुरस्कारप्राप्त)
लतादीदी म्हणजे संगीताचे विद्यापीठ
केवळ माझ्याच नव्हे तर संगीताचा वारसा जोपासणाऱया आमच्या पूर्वजांच्या तीन ते चार पिढय़ा त्यांच्या सुरावरच जगत आल्या आहेत. नेहमी शास्त्राrय संगीत वेगळे, चित्रपट संगीत वेगळे असे सांगितले जाते. परंतु, लतादीदींनी ते आव्हान लीलया पेलले. त्या म्हणजे संगीताचे विद्यापीठ होत्या. भक्ती, भाव, स्वर, निखरता आणि दर्जा या सर्वांचाच त्यांनी आपल्या गायनामध्ये अंतर्भाव केला होता. भारतीय संगीत सृष्टीच्या सुवर्णयुगाचा वारसा त्यांनी वैभवशाली केला.
– रविंद्र काटोटी (ज्येष्ट संवादिनी वादक)
लता मंगेशकर म्हणजे प्रति सरस्वती देवी
लता मंगेशकर म्हणजे प्रति सरस्वती देवी होत्या. 30 हजारहून अधिक गीते त्यांनी गायिली. परंतु, त्यातील एक गाणेसुद्धा बेसूर झाले, अशी इतिहासात नोंदच नाही. हिंदुस्थानी शास्त्राrय संगीतामध्ये सूर लावण्याची एक पद्धत असते. सुरेलपणा म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण फक्त आणि फक्त लता मंगेशकरच आहेत. चित्रपट गीतांमध्ये अनेकदा रिटेक होतात, एकाच टेकमध्ये गाणे पूर्ण करणे अत्यंत अवघड बाब आहे. परंतु, लतादीदींच्या बाबतीत मात्र ती अत्यंत सहज अशी बाब होती. हे आजच्या पिढीने शिकायला हवे. कोणत्याही पद्धतीचे गाणे म्हणावे परंतु त्याला शास्त्राrय बैठक असल्याने किती उंचीपर्यंत जाता येते, हे लता मंगेशकर यांच्या गायन कलेकडे पाहून आजच्या पिढीने लक्षात घेण्याची गरज आहे.
– प्रवीण गोडखिंडी (बासरी वादक)
लतादीदी गायन कलेचा अखेरचा शब्द
परिपूर्ण गाणे म्हणजे काय? याचे उत्तर लताताई आहेत. गायन कलेचा त्या अखेरचा शब्द आहेत. त्यांच्या प्रारंभीच्या काळात त्यांचा आवाज बारीक आणि पातळ आहे म्हणून नाकारला गेला. पण त्यांच्या आवाजातील वजन अन्य कोणत्याच गायिकेला आपल्या गायनात आणता आले नाही. आवाज कसा असावा, स्वर कसा लावावा, शब्दोच्चार कसे असावेत, शब्दोच्चाराच्या अनुरूप भावना गीतातून कशा व्यक्त कराव्यात, याचे उदाहरण म्हणजे त्यांचे गाणे होते. त्यांचे अत्यंत सोपे गाणे जरी घेतले तरी त्यातील एखादी जागा अशी असते की ती अन्य कोणाला जमत नाही. त्यांच्या गीताची नक्कल करणेच अशक्मय आहे. तेवढी उंची कोणी गाठू शकले नाही. त्या प्रसिद्ध गायिका होत्या, त्याहीपेक्षा आपला देश हा अनेकविध संस्कृती आणि भाषांचा देश आहे, या देशाला एकत्र बांधून ठेवण्यामध्ये लतादीदींचा स्वरही तितकाच महत्त्वाचा.
– रविंद्र माने, (तबलावादक)
लतादीदींसाठी अशक्य असे काहीच नव्हते
मास्टर दीनानाथ आपल्या भविष्याबद्दल अत्यंत जागरुक होते. इतके की आपला मृत्यू व वेळ त्यांनी सांगून ठेवली होती. त्यांनी लताच्या हाती लहानपणीच तंबोरा देऊन ‘हा तंबोरा साधू पुरुष आहे. तो तुला तारून नेईल,’ असे सांगितले होते आणि त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले. आज एखादा राग आपण शिकलो की संगीत गायक झालो, असे वाटते. परंतु, तसे नाही. संगीत खूप अवघड आहे. पण लतादीदींसाठी अशक्मय असे काहीच नव्हते. जुन्या रेकॉर्ड्समध्ये मालकंस रागामधील ‘पीर न जाने बालमा’ ही बंदिश ऐकल्यास त्यांच्या सुराची ताकद आपल्याला लक्षात येते. आपल्या घरचेच माणूस गेले आहे आणि सूतक आले आहे, अशी भावना माझी झालेली आहे.
– नंदन हेर्लेकर (गायक)
उत्कृष्टतेच्या ‘त्या’ आदर्श
त्यांच्यासमोर आम्ही नेहमीच विद्यार्थी राहिलो. लतादीदींनी आम्हाला कायम विद्यार्थीदशेत ठेवले. त्यांचे प्रत्येक गाणे ऐकताना दरवेळी नवीन काही तरी शिकण्यास मिळते. श्वासांचा आवाज नाही, सर्व भाषांचा उच्चारांचा अभ्यास यामुळे त्यांचे गाणे सर्वांगसुंदर होते. उत्कृष्टतेच्या त्या आदर्श असून अनेक दशके त्यांनी आम्हाला अप्रत्यक्षरित्या शिकविले आहे. अचूकतेचा त्यांच्या इतका आग्रह कोणीही धरला नसेल. रिऍलिटी शोमध्ये आज तुम्ही चांगले दिसणे पण महत्त्वाचे आहे, चांगले कपडे घातले पाहिजेत, हावभाव दाखवले पाहिजेत, असे सांगितले जाते. परंतु, लोकांना न दिसता केवळ श्रवण माध्यमातून थेट रसिकांच्या हृदयांचा ठाव घेणाऱयांचे खरे कौतुक. उपरोक्त सांगितलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट न करता या दोन बहिणी आपल्या काळजात खोल जाऊन बसल्या आहेत. आणि आज या सर्व गोष्टी करूनदेखील आपल्या मनाचा ठाव कोणीही घेऊ शकत नाही.
– श्रीधर कुलकर्णी (गायक)
एक स्वर्गीय सूर हरपला
एक स्वर्गीय सूर हरपला. शतकानुशतके असा सूर निर्माण होणे केवळ अशक्मय. वडील स्व. पंडित दीनानाथ मंगेशकर व स्व. उस्ताद अमानत अलीखान यांच्याकडे तालिम घेणाऱया लताताईंनी जगभर प्रस्तुती दिली. तरी प्रत्येक कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. हजारो कार्यक्रम केले तरी त्यांनी आपला रियाज कधीच सोडला नाही. वेगवेगळय़ा भाषेतील गीते गाताना त्या त्या भाषेचा अभ्यास त्यांनी केला.
– वर्षा नेने (शास्त्राrय संगीत गायिका)