प्रतिनिधी/ पणजी
या निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार सत्तेवर येईल आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी डॉ. प्रमोद सावंत हेच आरुढ होतील. डॉ. सावंत हेच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, असे स्पष्ट संकेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा भाजपचे निडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी जशी पक्षाची अडचण जशी समजून घेतली तशी उत्पल पर्रीकर यांनीदेखील समजून घेतली असती तर त्यातून मनोहर पर्रीकरांचे पक्षासाठी असलेल्या योगदानाबरोबरच त्यांच्या चिरंजिवाकडूनही फार महत्वाचे योगदान ठरले असते. आम्ही उत्पलला नाकारले नाही, उत्पलने भाजपला नाकारले आहे, असेही ते म्हणाले.
पर्रीकर हा आमचा परिवार आहे. भाजपने तयार केलेला एक वारसा आहे. कोणता राजकीय पक्ष एवढा मूर्ख असेल की तो वारसा नाकारेल? भाजपमध्ये आम्ही काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार भारतीय जनता पक्ष चालत असतो. भाजपवर कुणीही हुकुमशाही करू शकत नाही, असेही फडणवीस यांनी दै. ‘तरूण भारत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान सांगितले.
दै. तरूण भारत गोवाच्या संचालिका सई ठाकुर बिजलानी, संपादक सागर जावडेकर, सहसंपादक विजय पाटील, पत्रकार जय नाईक, प्रज्ञा मणेरीकर, शैलेश तिवरेकर, संपादकीय विभागातील प्रीती मराठे, श्रमी भोंसुले, रिमा केसरकर, अमिता सावंत, सोशल मीडीयाचे दत्तराज नाईक, विवेक पोर्लेकर, सुमित तांबेकर, मार्केटिंग विभागातील अनिल कालेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
पर्रीकरांच्या काळात तडजोड झाली, आता का नाही?
बाबूश मोन्सेरात यांना मंत्रीपद देण्याचे मनोहर पर्रीकर यांच्याकाळातच ठरविण्यात आले. राजकीय परिस्थितीमध्ये तडजोड मनोहर पर्रीकर यांनी केली, तर आता का होऊ शकत नाही? उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी परिवारामधून बाजूला होण्याचा जो निर्णय घेतला तो भाजपसाठी दुःखद आहे. उत्पल यांच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही की भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. भाजपने जी तिकिट त्यांना देऊ केली होती ती त्यांनी नाकारली. उत्पल यांनी भाजपने सूचविलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.
कधी कधी कठोर निर्णय घेणे आवश्यक असते
पणजीमध्ये बाबूश मोन्सेरात निवडून आल्यानंतर ते भाजपमध्ये आले. त्यावेळी त्यांना पणजीचे तिकिट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता उत्पल पर्रीकर पणजीतून निवडणूक लढवायला इच्छुक होते. त्यावेळी आम्ही त्यांना दोन जागा ऑफर केल्या. पारंपरिक भाजपची जागा ऑफर केली होती आणि त्या जागी निवडणूक लढविण्याचे सांगितले होते. याशिवाय पाच वर्षांनी उत्पलला पणजीची उमेदवारी देण्याबाबतही कबूल केले होते. पारदर्शकता ठेवून उत्पल पर्रीकर यांच्याशी चर्चा केली होती. परंतु त्यांचा पणजीबाबतचा आग्रह जो होता तो धोक्याचा होता. भाजप पक्षाच्या परिवारामध्ये जे निर्णय होतात ते मान्य करावे लागतात. जर ते मान्य करत नाहीत तर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसा कठोर निर्णय घेऊन आम्हाला पणजीतील उमेदवार घोषित करावा लागला.
सिद्धेश नाईक यांचे कौतुक करायला हवे
लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यामागे कायम भाजप उभा राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीबाबतही पार्सेकर यांच्यासोबत चर्चा केली होती. परंतु तेसुद्धा अडून बसले. पक्षाला कुणीही अडून घेऊ शकत नाही. याबाबत सिद्धेश नाईक यांचे कौतुक वाटते. फक्त केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा मुलगा म्हणून त्यांचे नाव ओळखत नसून त्यांनी विविध स्तरावर काम केले आहे. मोठे नेते संस्कार विसरतात आणि संस्काराच्या पलीकडे जातात याबाबत दुःख होते. प्रत्येक उमेदवाराला समजावून त्यांचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
दीपक पाऊसकरांवरील आरोप भाजप प्रतिष्ठेला मारक
मगोचे आमदार दीपक पाऊसकर आणि बाबू आजगावकर यांना उमेदवारीचे आश्वासन दिले नव्हते, परंतु मडगावात आम्हाला ताकदीचा उमेदवार हवा होता आणि ती उमेदवारी भाजपने बाबू आजगावकर यांना दिली. परंतु दीपक पाऊसकर यांच्यावर काही आरोप होते, ज्यामुळे भाजपच्या प्रतिष्ठेवर प्रश्न येतील म्हणून त्यांना उमेदवारी दिली नाही. परंतु मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक आरोप लावले असून संबंधित महिलेने सांगितल्यानंतर महिला पोलिसांनी त्यांना क्लिन चीट दिल्यानंतर मिलिंद नाईक यांना उमेदवारी देण्यात आली, असे फडणवीस यांनी सांगितले.
भाजपचे काँग्रेसीकरण झालेले नाही
भाजपचे काँग्रेसीकरण झाले असे म्हणता येणार नाही. परंतु काहींचे आम्ही भाजपीकरण केल्यामुळे काँग्रेसचे काहीजण पक्षात आले आहेत. त्यामुळे ते आमचे काँग्रेसीकरण करू शकत नाही. आम्ही त्यांना भाजपमय केले आहे. भाजपमधून देण्यात येणारी तिकिटे किंवा उमेदवारी ही 90 टक्के भाजपच्या तत्त्वांनुसार (ऑर्गेनिकली) देण्यात आली आहेत तर दहा टक्के तिकिटे ही बाहेरूनच आली आहेत. ज्याप्रमाणे गोव्यातील राजकारण चालले आहे त्यातून चांगले करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि एकुणच भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत यातील जे बहुतांश कार्यकर्ते ज्या संस्कारातून आले आहेत, त्या संस्कारामुळे पक्षाने घेतलेला निर्णय ते मान्य करतात आणि भाजप ही मोठी होण्यामागे एकमेव कारण म्हणजे अपेक्षा न करता कार्य करणारी फौज भाजपकडे असून त्यांना सांभाळणे हे आमचे काम आहे असे मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.
म्हादईबाबत कुठलीच तडजोड करणार नाही
भाजप सरकारने म्हादईचा विषय समन्वयाने सुटावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मी मुख्यमंत्री असताना गोव्याच्या बाजूने बैठक बोलावली होती. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याची भूमिका मांडण्यासाठी सांगितली होती. कुठल्याही परिस्थितीत म्हादईच्याबाबत गोव्याची भूमिका पाहिली जाणार आहे. भाजप गोव्याच्या भूमिकेत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गोव्यातील राजकारणात आहेत काही प्रवासी
राजकारण हे सध्या स्पर्धात्मक झाले आहे. पूर्वी उमेदवारी मिळाली की लोक पाच वर्षे वाट पाहत असे. आता कुणी वाट पाहत नाही. त्यामुळे काही ठिकाणी अडचणी येतात. ज्याप्रकारे लोक बंडखोरी करायचे, तशी बंडखोरी आता झालेली नाही. जो निवडून येणारा पक्ष असतो त्याकडे जास्त गर्दी असते. गोव्याचा वारसा असा आहे की गोव्यात ज्याप्रमाणे प्रवासी मोठय़ा प्रमाणात येतात त्याप्रमाणे गोव्यातील राजकारणातही प्रवासी काहीप्रमाणात आहेत. त्याचा फटका काही पक्षांना पडत असतो, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
राजकारण व्यवसायाला पुन्हा राजकारणाकडे
आणण्याचे कार्य केले पर्रीकरांनी
गोव्यामध्ये राजकारणाचा व्यवसाय झाला होता. परंतु तो व्यवसाय पुन्हा राजकारणाकडे आणण्याचे काम मनोहर पर्रीकर यांनी केले. गोव्यातील राजकारणामधील अस्थिरता आणि अतिव्यावसायिकता त्यांनी कमी केली. गोव्याचे राजकारण बदलू शकते, हे मनोहर पर्रीकरांनी दाखविले.
काँग्रेसच्या आरोपांना पुरावेच नाहीत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर सोळाशे कोटीचा खाणघोटाळय़ाचा आरोप करण्यात आला होता, त्यावर एवढच म्हणू शकतो की ‘कपोलकल्पित आरोप’ आहे. काँग्रेस पक्ष एकसुद्धा पुरावा देऊ शकत नाही. भाजपच्या दहा वर्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसने अनेक आरोप केले परंतु एकसुद्धा पुरावा देऊ शकले नाहीत. आरोप करणे म्हणजे आरोप सिद्ध होत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
खाण समस्या सोडविण्यासाठी खाणमहामंडळाची सोय करण्यात आली आहे. आता जो नवीन खाणकायदा सुरू करण्यात आला आहे त्या कायद्यात सर्व अधिकार हे सरकारकडे आहेत. पूर्वी पोर्तुगीजांच्या काळापासून लीजेस होत्या. काही लोकांकडेच त्यांची मालकी होती. त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे वैध मानले जात नव्हते. परंतु जेव्हा यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला झाला आणि न्यायाधीश चंद्रचूड यांचा निवाडा पाहिल्यानंतर आपल्याला नवीन कायद्यानुसार जाऊन खाणमहामंडळ स्थापन करून एमडीआरची रचना करायची आहे. त्यामुळे खाणमहामंडळ सुरू करणे हे पहिले पाऊल आहे. खाण डंपबाबत धोरण करणारे गोवा हे पहिले राज्य आहे. खाणमहामंडळाद्वारे सर्वोच्च न्यायालयात गेलो तर न्यायालय नक्कीच मान्यता देईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
दहा वर्षाचा विकास अजेंडा गोमंतकियांसमोर ठेवणार
गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. कुठल्याही पक्षाची मदत घेण्याची वेळ येणार नाही. विकासाचा अजेंडा हा केवळ भाजपने ठेवला आहे. इतर पक्ष गोमंतकीयांना अनेक सवलती देऊ पाहत आहेत. भाजपच्या शासन काळामध्ये पर्यटकांची संख्या तीन पटीने वाढली. आता 365 दिवस पर्यटक राहतात. आता कोरोनामुळे संकट आले ती वेगळी गोष्ट आहे. आम आदमी सारखा पक्ष केवळ नागरिकांना आश्वासने देत असून आणि ज्या दिल्लीचे ते सर्वांना उदाहरण देत विकासाचे गाजर दाखवतायेत त्या दिल्लीतच आता नागरिकांना वीज, पाणी सारख्या मुलभुत घटकांसाठी संषर्घ करावा लागत आहे. परंतु भाजप येत्या एक ते दोन दिवसात पुढील दहा वर्षात गोमंतकीयांसाठी काय काय विकासाची रुपरेषा असणार आहे. याबद्दल केंद्रीय रस्ते व वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्याद्वारे अजेंडा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
पर्यटनावर आपली अर्थव्यवस्था मजबुत करत आहेत
गोव्यात पर्यटनाच्या दृष्टीने विकासाकरिता अजून संधी असून भाजप पुन्हा सत्तेवर आल्यानंत त्यासाठी सरकारमार्फत ठोस प्रकल्प हाती घेण्यात येतील. गेल्या काही वर्षात गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. ती अजुनही वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मूल्यांचा सर्वच क्षेत्रात होतोय ऱहास
सामाजिक मूल्ये बदलत आहेत. मूल्यांचा सर्वच क्षेत्रात ऱहास होत असला तरी बदलेल्या मूल्यांना समजून तसे वागले पाहिजे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षात कडक मूल्ये रूजविली आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात 30 उमेदवारी कापण्यात आली. अशाप्रकारचे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. सत्तेत नसताना मूल्ये जपणे कठीण असते. परंतु सत्तेत आल्यावरही ती मूल्ये जपण्याचे कार्यही मोदी यांनी केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आत्मनिर्भर गोवा जी संकल्पना सुरू केली ती संकल्पना आणखी विकसित झाली तर सरकारी कामांमधील समस्या दूर होऊ शकते. याशिवाय जो भ्रष्टाचार होतो त्याबद्दल माहिती दिली तर नक्कीच यावर कारवाई करण्यात येईल असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.