जिल्हय़ातील 15 जणांचे मृत्यूः परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 125 वाढलेः ग्रामीण भागात 168 रूग्ण वाढले
प्रतिनिधी/सांगली
मंगळवारी जिल्हय़ात नवीन 293 रूग्ण वाढले तर 238 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 18 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 15 जणांचा आणि परजिल्हय़ातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 360 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 125 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन 125 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 90 तर मिरज शहरात 35 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात मोठयाप्रमाणात रूग्ण वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने अदिसागर मंगल कार्यालय येथे नवीन रूग्णालय सुरू केले आहे. पण तरीही सातत्याने रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामध्येच महापालिकेकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्ट मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत. मिरजेत नवीन 35 रूग्ण वाढलेले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या पाच हजार 222 झाली आहे.
ग्रामीण भागात 168 रूग्ण वाढले
मंगळवारी ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 168 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 11, जत तालुक्यात सहा, कडेगाव तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात आठ, खानापूर तालुक्यात 24, मिरज तालुक्यात तब्बल 34 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात एक, शिराळा तालुक्यात 14, तासगाव तालुक्यात आठ आणि वाळवा तालुक्यात 60 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 168 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 15 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 15 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 70 आणि 67 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 64 वर्षीय महिलेचा सिनर्जी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 79 वर्षीय व्यक्तीचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर 68 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरजेतील चौघांचा मृत्यू झाला 33 वर्षीय युवक आणि 55 वर्षीय महिलेचा मिरज कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 48 वर्षीय महिलेचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 53 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुपवाड येथील 60 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात तर 61 वर्षीय महिलेचा विवेकानंद हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील काळम्मवाडी येथील 80 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गोटखिंडी येथील 75 वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरी मृत्यू झाला. खानापूर नागेवाडी येथील 67 वर्षीय महिलेचा विटा ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील ढवळी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या 15 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 360 झाली आहे.
परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू
मंगळवारी परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 74 वर्षीय व्यक्तीचा तर शिरोळ येथील 55 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. शिरोळ येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 90 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
साडे पाच हजार रूग्णांची कोरोनावर मात
मंगळवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे तब्बल 238 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग बारा दिवस मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच हजार 552 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 8970
बरे झालेले 5552
उपचारात 3058
मयत 360