प्रतिनिधी / जत
राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात विस्तवही जात नसताना इकडे सांगलीच्या जत तालुक्यातील भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र काम करण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. जत तालुक्याला सतत फसवणुकीचे धोरण जतची काँग्रेस,आ. विक्रम सावंत आणि त्यांची चांडाळ चौकडी करत आहे. यात तालुक्याचे नुकसान होत आहे. यापुढे आमचा प्रखर विरोध काँग्रेस व आ. विक्रम सावंत यांना असेल अशी जाहीर ग्वाही भाजप नेते तथा माजी आमदार विलासराव जगताप व राष्ट्रवादी नेते सुरेशराव शिंदे यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना या दोन्ही पक्षाने घेतलेला निर्णय जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे.
जत शहरातील वीर शिवा काशीद उद्यान कामाच्या भूमिपूजन प्रसंगी हे दोन्ही नेते बोलत होते, विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सत्ताधारी आ विक्रम सावंत यांना निमंत्रण दिले नाही, पत्रिकेत नावही नव्हते, यामुळे एकीकडे काँग्रेस नगराध्यक्ष यांच्यासह नगरसेवक यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता, तर भाजप आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी झाडून उपस्थित होते, या छोटेखानी कार्यक्रमात विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे यांनी आमदार विक्रम सावंत यांच्यावर जोरदार टीका आणि आरोप करत त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हिसका दाखवण्याचे आव्हान दिले.
तसेच आ. सावंत यांनी जत तालुक्याची अब्रू राज्याच्या विधिमंडलात घालवली, बेबी कालवा, हक्कभंग असे विषय विधिमंडळात मांडून आपल्या अक्कलेचे तारे त्यांनी दाखवून दिल्याची जहरी टीका जगताप व शिंदे यांनी केली. यापुढे जतेत जगताप शिंदे हा नवा पॅटर्न अस्तीत्वात येईल, पक्ष हा राजकीय सोयीसाठी असतो, सर्वच नियम पाळणे बंधनकारक नाही हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.