प्रतिनिधी/सांगली
दोन दिवसापासून ऑक्टोबर हिटने हैराण झालेल्या सांगलीकरांना रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने दोन तास झोडपले. यामुळे शहरातील मारूती रोड, टिळक चौक, स्टेशन चौक, शिवाजी मंडई अशा प्रमुख चौकांसह बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेल्याने अक्षरशः सांगली तुंबल्यासारखी स्थिती निर्माण झाली. उपनगरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक झालेल्या या मुसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या तीन चार दिवसांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परंतु सांगलीत तुरळक सरी वगळता पाऊस नव्हता. दोन दिवसांपासून मात्र वातावरणात जोरदार उष्मा वाढला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून उकाडा जाणवू लागला होता. रविवारी सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली आणि अंधारून आले. अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. दोन तास सांगलीला झोडपून काढले. काही वेळातच सर्व रस्ते आणि मुख्य चौकात पाणी साचले. शहरातील सर्वच रस्ते आणि चौक सरासरी गुडघाभर पाण्याखाली गेले. अर्ध्या तासात अक्षरशः सांगली तुंबली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
पावसाच्या उघडीपीनंतरही बराचवेळ वाहतूक सुरळीत झाली नव्हती. शिवाजी मंडईत पाणी शिरल्याने भाजी विक्रेत्यांना भाजीपाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासही संधी मिळाली नाही. तर मारूती रोडवर तीन ते चार फुट पाणी साचल्याने नागरिकांसह व्यापाऱयांचीही त्रेधा उडाली. तीन चार महिन्यापूर्वीच मारूती चौकातील गटारीची दुरूस्ती करण्यात आली असल्याने आता तेथे पाणी साचणार नाही असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु मारूती चौकाला तळयाचे स्वरूप आले होते. या चौकात कमरेइतके पाणी साचले होते. उशीरापर्यंत पाण्याचा निचरा झाला नव्हता. पावसाच्या मुसळधारेमुळे नागरिकांना ढगफुटीचाच अनुभव आला.
शामरावनगर, दत्तनगर, काकानगर, काळी वाट, हनुमाननगर, वारणाली परिसरातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सर्वच रस्ते आणि चौकातील वाहतूक खोळबंली होतीच. परंतु सर्व नाले ओव्हरफ्लो झाल्याने वाहनधारकांचे अंदाज चुकून अपघातही झाले. काही ठिकाणी वाहने नाल्यात अडकून वाहतूक ठप्प झाली. एकूणच या मुसळधारेने सांगलीकरांना तीन महिन्यापुर्वी झालेली अतिवृष्टी आणि महापुराची आठवण पुन्हा एकदा झाली.
मिरजेतही जोरदार पाऊस
सांगली शहर आणि परिसरासह मिरजेतही जोरदार पाऊस झाला. मिरजेत एक ते दीड तास झालेल्या मुसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
शहर अंधारात
ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि सर्व रस्ते ठप्प झाले असतानाच वीज पुरवठा खंडित झाल्याने शहर अंधारात गेले होते. पावसाला सुरूवात होताच महावितरणने वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे सर्वत्र पाण्याबरोबर अंधार पसरला होता. पाऊस उघडल्यानंतर काही वेळाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला.