अध्याय सातवा
अवधूत यदुराजाला म्हणाले, काळाची गती अदृश्य असते पण त्यानुरूप काम करून लोकांना संतोष वाटेल असे कार्य कसे करावे हे मला सूर्याकडे पाहून समजले म्हणून मी त्याला गुरु केला. सूर्य त्याच्या किरणांनी पृथ्वीवरील जल शोषून घेत असतो व नंतर योग्यवेळ येताच त्या जलाचाच वर्षाव करून पृथ्वीवरील सर्वाना तृप्त करत असतो. असा वर्षाव करत असताना तो स्वतःजवळ काहीही ठेवून घेत नाही उलट जितके शक्मय होईल तितके लोकांचे भले कसे होईल हे पाहण्याकडे सूर्याचे लक्ष असते म्हणून तो एक धारेने घेऊन हजार धारांनी परत करतो योग्यानेही असेच वागावे. त्याला जे कोणी काही देतात त्याना हजार मार्गांनी ते परत करून त्याचे मनोरथ पूर्ण करावे. म्हणून योग्याची जे सेवा करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतातच आणि शेवटी तो त्यांना निष्काम करून निजधामाला आणतो. योगी जे काही विषय सेवन करतो त्यात त्याची आसक्ती अजिबात नसते. सूर्य जल शोषून घेतेवेळी तसेच पाऊस पाडतेवेळी जसा अलिप्त असतो तसा योगी विषयापासून पूर्णपणे अलिप्त असतो. योगी योगबळाने इंद्रियांचा मेळ करून विषयसेवन करतो. त्याला जे कोण काही देतील ते ग्रहण करतो आणि वेळ येताच हजार वाटांनी ते त्यांना परत करतो. हा अलिप्तपणाचा गुण अवधुतानी सूर्याकडून घेतला. सूर्याचे प्रतिबिंब डबक्मयात पडते लोकांना वाटते सूर्य डबक्मयात आला आहे किंवा समुद्रात पडलेले सूर्याचं प्रतिबिंब लाटांबरोबर हेलकावे खात असते लोकांना वाटते सूर्य हेलकावे खात आहे, पण सूर्य हा डबक्मयाला किंवा समुद्राला शिवतही नाही, तो डबक्मयात बुडतही नाही की समुद्राबरोबर हेलकावेही खात नाही. तो आपला आकाशात अलिप्त असतो. तसेच योग्याने असले पाहिजे पण प्रत्यक्षात लोकांना तो देहकर्म करत आहे असे दिसते. त्यामुळे ज्यांना देहबुद्धीचाच छंद आहे ते म्हणतात, योगी तर आमच्याप्रमाणेच देहाबरोबर विषयसेवन करतो आहे म्हणजे तो देहातच नांदत आहे मग तो वेगळे विशेष असे काय करतो? प्रत्यक्षात जरी तो देहकर्म करत असला तरी तो देहातीत असतो. ज्यांना देहभान हेच सर्वस्व वाटते त्यांना योग्याचे गुह्यज्ञान कळत नाही. ते आपले दोरीलाच साप समजत असतात आणि साप साप म्हणून भुई धोपटत असतात. पण योग्याला साप आणि दोरी यातला फरक माहीत असतो. त्याचा आत्मा चिदाकाशात असून मिथ्या रूपाने प्रतिबिंबित होऊन देहकर्माला दाखवतो, म्हणून कर्म योग्याला बाधक होऊ शकत नाही. साहजिकच योग्याने स्वतः देहापेक्षा भिन्न आहे हे लक्षात घेतले की कोणत्याही प्रकारच्या देहकर्माला भिण्याचे त्याला कारण रहात नाही. एवढे सांगून अवधूत म्हणाले, मृगजळाचा पूर पाहून मूर्ख लोक प्रचंड पाण्याचा साठा म्हणून त्याच्यामागे धावतात. ते त्यांना जिथे पाणी आहे असे वाटते तिथपर्यंत पोहोचले की तो पाण्याचा साठा आणखीन दूर आहे असे भासते. असे वारंवार घडत राहते आणि शेवटी निराशा पदरी येते. दुर्दैवाने त्यांना तो पाण्याचा साठा कधीच हस्तगत होऊ शकत नाही. संसारात कोणतीही आसक्ती ठेवू नये याविषयी मी तुला कपोत पक्षाची कथा सांगतो.