सोशल डिस्टनिंग पाळण्याची गरज : अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी वर्दळ
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठीच आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. गर्दी टाळणे हा लॉकडाऊनचा मुख्य हेतू आहे. एखादी गोष्ट सुरु झाली की नागरिक गर्दी करतात. तीच गर्दी संसर्ग वाढवून मोठा धोका निर्माण होवू शकतो. ही गर्दी टाळण्यासाठीच पुढील काळात काही नियम, बंधने पाळणे गरजेचे आहे. मात्र, लॉकडाऊन दोननंतर शुक्रवारी शिथीलता दिल्यानंतर सातारकरांनी रस्त्यावर गर्दी केली होती. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जरी बाहेर पडत असाल तरी सोशल डिस्टनिंग, मास्क वापरणे व गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व नागरिकांची सुरक्षा खूप महत्वाची असून त्यासाठीच सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनाला मदत केली पाहिजे.
ज्या सातारा शहर व उपनगर परिसरात प्रथम एकच बाधित रुग्ण आढळून आला होता त्याच सातारा शहरात सध्या 14 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर कराडकरही महिन्यापूर्वी प्रचंड निश्चिंत होते मात्र त्याच कराड व परिसरात 85 बाधित रुग्ण आढळून आल्याने ही दोन्ही शहरे व आजुबाजूचा परिसर कंटेन्मेंट झोन होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणून संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान प्रशासनासह नागरिकांवर असल्याने घरपोच किराणा, भाजीपाला, दूध व मेडिकल, सुविधा सोडल्यास सध्या तरी या दोन्ही झोनमध्ये काहीही सुरु नव्हते. मात्र, नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तू, मेडिकल, पेट्रोल सुविधांची मागणी वाढू लगली होती.
सातारा जिल्हय़ात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले. आता आवश्यकतेनुसार प्रांताधिकाऱयांना तसे आदेश देवून काही प्रमाणात शिथीलता आणली जाईल पण या सर्व गोष्टी हळू हळू सुरु होतील. या प्रक्रियेतील सर्व नियम सर्वांना पाळणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकरी शेखर सिंह यांनी सांगितले होते. शुक्रवारी शहरातील किराणामाल, मेडिकल, दूध, भाजीपाला विक्री सुरु झाली. त्यामुळे सातारकर नागरिकांची रस्त्यावर, दुकानांसमोर वर्दळ सुरु झाली. बऱयाच अंशी नागरिकांना सोशल डिस्टनिंगचे महत्व कळाले असले तरी गर्दी होत असल्याने ते गंभीरपणे पाळले जात नसल्याने यापुढे सोशल डिस्टन्स, मास्क, स्वच्छता आदी गोष्टी अंगवळणी पाडून घेण्याची गरज आहे.
वाहनचालकांकडून नियमांचा भंग
लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक वस्तू म्हणजे किराणामाल, दूध, मेडिकल, पेट्रोल, दवाखाने सोडता काहीही सुरु राहणार नाही. या सुविधा घेताना वाहनचालकांसाठी नियम करण्यात आले आहेत. दुचाकीवर फक्त चालकच व चारचाकीमध्ये चालक व दोन व्यक्ती असा नियम असून सातारकर मात्र बिनधास्तपणे दुचाकीवरुन डबलसीट जात होते तर चाकचाकी वाहनात देखील नियम पाळला जात नव्हता. असे नियम मोडून कोरोनाविरुध्दची लढाई जिंकणे अवघड होईल याचे सातारकरांनी भान ठेवावे.
कंटेटमेंट झोनमध्ये घरपोच सेवा
सातारा शहरात सदरबझार, राधिका रस्त्यावर गार्डन सिटी, प्रतापगंज पेठ, जिल्हा कारागृह, कोडोली येथे रुग्ण आढळून आले असल्याने ती ठिकाणी मायक्रो कंटेटमेंट झोन आहेत. तो भाग सील करण्यात आला असून या सर्व ठिकाणी नागरिकांना हालचाली करण्यास निर्बंध आहेत. जोपर्यंत कंटेटमेंट झोन उठत नाही तोपर्यंत अत्यावश्यक बाब सोडल्यास नागरिकांना परिसर सोडता येणार नाही. प्रशासनाच्या या नियमाचे त्या कंटेटमेंट झोनमधील नागरिकांना काटेकोरपणे पालन करावयाचे आहे.
दुपारनंतर सगळेजण घरटय़ात
सकाळी दुकाने सुरु झाल्याने दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत साताऱयातील रस्त्यावर वर्दळ सुरु राहिली. काही भागात नेमका आदेश न कळल्याने दुकानेही सुरु नव्हती. मात्र कळल्यानंतर दुकानेही सुरु झाली. मात्र दुपारी 11 नंतर उन्हाचा तडाखा वाढत गेला. 42 अंश डिग्री सेल्सिअस तापमानामुळे हैराण झालेले सातारकर मग आपापल्या घरटय़ात परतू लागले. दुपारनंतर साताऱयातील रस्ते पुन्हा ओस पडले होते. सध्या तरी कोरोनाचे संकट टळेपर्यंत नागरिकांना घरटीच जवळ करावी लागणार आहेत.
पोलीस ठाण्यात खिडकीतून फिर्याद
जिल्हा कारागृहातील पुण्याहून आणण्यात आलेले कैदी कोरोनाबाधित आढळून आल्याने खुद्द पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. पुण्याहून या ब्यादी कशाला उचलून आणल्या अशीच भावना आहे. या बाधितांमुळे कारागृह परिसर सील असला तरी शहर पोलीस कारागृहाच्या बाहेरच आहे. मात्र तिथे आता हालचालींना मर्यादा आल्या असून नागरिकांना पोलीस कर्मचाऱयांशी त्यांच्या समस्या सांगण्यासाठी ठाण्याबाहेरील खिडकीचा आसरा घ्यावा लागत आहे. पोलीस कर्मचाऱयांच्या एक खिडकी योजनेचा लाभ नागरिकांना तारेच्या कंपाऊंडमधून आत जात घ्यावा लागत आहे.