सावंतवाडी/प्रतिनिधी:-
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या रक्तपेढीबाबत शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर त्रुटी उपस्थित केल्या आहेत. येथील रक्तपेढीत संकलित करण्यात येणाऱ्या रक्त संचलन चाचणी, रक्तप्रक्रीया, विक्री वितरण, रक्त शिबीर या सर्व गोष्टी 10 महिने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित करण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच HIV 1 & 2 अॅन्टीबाॅडीज करिता एलायझा चाचणी न करता फक्त spot test करून रक्त पिशव्या रूग्णांना वितरीत करण्यात येत होत्या. ही पद्धत घातक आहे.
त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत रक्त संचलन व विक्री करण्यात येऊ नये असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले असून या संदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या सर्व बाबी पाहता रक्तपेढी बंद करण्याचा घाट शासनाने घातला असून यासंदर्भात जिल्हा स्तरावर जन आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांची भेट घेऊन रक्तपेढी सुरळीत चालू राहण्यासाठी तत्काळ प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, राघू चितारी, अर्चित पोकळे, मेहर पडते, गौतम माठेकर, प्रथमेश प्रभु, साईश निर्गुण, पडते आदी उपस्थित होते